आदित्य ठाकरेच राहणार ५ वर्ष मुख्यमंत्री, संजय राऊत यांच्या वक्‍तव्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – शिवसेना आणि भाजप यांच्या महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु असताना आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. ‘आदित्य ठाकरे पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील, आदित्य ठाकरे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार, ‘असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्रीपदाबाबत चंद्रकांत पाटील किंवा सुधीर मुनगंटीवारांना बोलण्याचा अधिकार नाही, असे म्हणत त्यांनी भाजप नेत्यांना टोमणा मारला आहे. आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मागणी करत आहेत. त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाची देखील चाचपणी सुरु असल्याचे बोलले जात आहे. माहीम, शिवडी किंवा वरळीमधून ते निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष विधानसभा एकत्रित लढणार असले तरी जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यात रस्सीखेच सुरु असून दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात येत आहे. मात्र जागा कितीही असोत मुख्यमंत्री भाजपचाच या भाजपच्या धोरणामुळे शिवसेना नाराज झाली असल्याची पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेना नेते मुख्यमंत्रीपद हे अडीच अडीच वर्षांसाठी वाटून घेणार असल्याचे सांगत असताना भाजप नेते मात्र मुख्यमंत्रीपद पाच वर्षासाठी आमच्याकडेच राहणार असल्याचे सांगत आहेत. नवी दिल्लीत काल झालेल्या महाराष्ट्र भाजपच्या बैठकीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री पाच वर्ष आपलाच राहणार असल्याचे सांगितल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर २८८ पैकी २२८ युतीचे निवडून आणण्याचे देखील अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.

दरम्यान, ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री हा युतीचा फॉर्म्युला असताना भाजपकडून हि अशी मागणी झाल्याने शिवसेना नाराज झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या या विधानावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

गरोदरपणातील समज-गैरसमज ? जाणून ‘घ्या’ सत्य

यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही