तब्बल ५० वर्ष ‘लिव्ह इन’मध्ये राहून मग केले ‘मॅरेज’

साबरकांठा : वृत्तसंस्था – लग्न न करता एकत्र राहणं म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप, हे शहरात सामान्य आहे. मात्र त्याला पूर्ण समाजाने स्वीकारलेले नाही. शहरी समाजातील काही लिव्ह इन रिलेशनशिपकडे द्वेषाच्याच नजरेने बघतात. पण शहरात सुशिक्षित समाजातही परिस्थिती असेल तर खेडेगावातील लोक काय विचार करतील हे सांगयला नको. पण जर एखाद्या खेडेगावातच एखाद जोडप लिव्ह इनमध्ये राहिलं तर. आणि तेही ५० वर्षांपूर्वी पासून राहत असेल तर काय झालं असेल त्यांच्यासोबत गावात मान्यता मिळाली असेल का, असे अनेक प्रश्न समोर येतात. असं सत्यात घडले आहे.

गुजरात मधील साबरकांठा जिल्ह्यातील पोशीना तालुक्यात राहणारे गमनाभाई आणि बंजरी देवी हे जोडपे जवळपास ५० वर्ष ‘लिव्ह इन’ मध्ये राहिले आहेत. त्यानंतर ते आता नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये त्यांना मुलं आणि नातवंडही आहेत. त्यांच्या लग्नाला त्यांच्या मुलांसोबतच त्यांची नातवंडही उपस्थित होती.

डंगरू गरासिया भील या समाजात लग्नासाठी सार्वजनिक मेळे घेतले जातात. अश्याच एका मेळ्यात गमनाभाई आणि बंजरी देवी यांनी एकमेकांना पसंत केले आणि ते एकत्र राहू लागले, अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली. लग्नासाठी जवळपास दीड ते दोन लाख रूपये खर्च येतो. आदिवासी मजूरी करून आपली पोटं भरतात. त्यामुळे लग्नासाठी लागणाऱ्या खर्चाची जमवाजमव होई पर्यंत जोडपी एकत्र राहतात. पैसे जमल्यावर सर्वांचे आदरातिथ्य आणि रितीरिवाज पद्धतशीरपणे करत जोडपी लग्न करतात, अस या समाजातील मान्यता आहे. लोकही याकडे खूप सकारात्मक दृष्टीने बघतात, असंही त्यांच्या मुलाने सांगितलं.

दरम्यान, गुजरातमधील डंगरू गरासिया भील आदिवासी समूहातील हे दोघे आहेत. यांच्या समूहात लग्न करण्याआधी लिव्ह इन‘ मध्ये राहण्याला परवानगी आहे. तर लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या लोकांना होणाऱ्या मुलांना समाजात स्थान मिळेल यावरही शंका व्यक्त केल्या जातात. पण येथे मात्र लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांना होणाऱ्या मुलांनाही या समाजात मान्यता मिळते. अशा प्रकारची लग्ने नेहमी या समाजात लावली जातात.