धक्कादायक ! चांद्रयान-2 चे सल्लागार डॉ.गोस्वामी यांच्या कुटुंबाला NRC तुन वगळले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चांद्रयान २ आज ऐतिहासिक कामगिरी करणार असून त्याबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहेत. यातच एक धक्कादायक बातमी आली असून आसाममधील प्रख्यात वैज्ञानिक आणि चंद्रयान २ मिशनचे सल्लागार डॉ. जितेंद्र नाथ गोस्वामी यांच्या कुटुंबाला अंतिम नागरिक नोंदणी (NRC) यादीत स्थान मिळाले नसल्याचे वृत्त आहे. ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या एनआरसीमध्ये गोस्वामीबरोबरच त्याच्या कुटुंबातील सदस्यांची नावेही सापडली नाहीत. दरम्यान जितेंद्र गोस्वामी हे अहमदाबादमध्ये वास्तव्यास असल्याने NRC यादीत नाव येण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांचे नाव आले नसल्याचे म्हटले जात आहे.

काय आहे डॉ.गोस्वामी यांची प्रतिक्रिया :
याबाबत डॉ गोस्वामी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले “आम्ही गेली २० वर्षे अहमदाबादमध्ये राहत आहोत. एनआरसीमध्ये आमची नावे समाविष्ट करण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते करण्यास आम्ही अपयशी ठरलो आहोत. परंतु आमचे कुटुंब आसाममध्ये आहे, आमच्याकडे जोरहाटमध्ये जमीनही आहे.” तसेच याबाबतीत पुढे काय असे विचारले असता “भविष्यात काही समस्या असल्यास, आम्हाला जमीन कागदपत्रे दाखवून काहीतरी करावे लागेल,” असेही त्यांनी सांगितले. “मी यावर माझ्या भावासोबत बोलतो आणि पुढे काय करावे याबद्दल त्याचा सल्ला घेईन. आम्ही अहमदाबादमध्ये राहतो आणि अहमदाबादमध्ये मतदानाचा हक्क आहे. आसामला परत जाण्याची माझी कोणतीही योजना नसल्यामुळे मला त्यात जास्त फरक पडेल असे मला वाटत नाही, ”असे पुढे म्हणाले.

डॉ. गोस्वामी हे आसाम विधानसभेचे सभापती हितेंद्र नाथ गोस्वामी यांचे बंधू आहेत. त्यांना याबाबतीत विचारले असता “माझ्या भावाचे नाव एनआरसीमध्ये समाविष्ट नाही कारण त्याने जास्त रस दाखविला नाही. ते अहमदाबादमध्ये कायमस्वरुपी राहत आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी काही फरक पडणार नाही, ”असे स्पीकर गोस्वामी म्हणाले. गोस्वामी हे भारताच्या मंगळयान कार्यक्रमात सहभागी झाले आहेत आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) यांनी यशस्वीरित्या सुरू केलेल्या चांद्रयान २ मिशनचे सल्लागार देखील आहेत.