आता ‘या’ जिल्ह्याच्या नामांतरावरून वातावरण तापणार, CMO चे ट्विट ठरतंय चर्चेचा विषय, सेना-काँग्रेस पुन्हा आमने- सामने येण्याची शक्यता
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद-संभाजीनगरवरून सुरू असलेला वाद शमला असताना आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती देताना उस्मानाबादच्या पुढे धाराशिव असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना-काँग्रेस यांच्यात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘धाराशिव-उस्मानाबाद येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न 430 खाटांचे रुग्णालय निर्माण करण्याची माहिती CMO कार्यालयाने ट्विटमध्ये दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.#मंत्रिमंडळनिर्णय@AdvYashomatiINC pic.twitter.com/Qwn57zhLN8
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 13, 2021
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री कार्यालयाच्या ( CMO) ट्विटर अकाऊंटवरून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर म्हणून केल्यानंतर राजकीय वातावरण तापल होत. सीएमओकडून केलेल्या ट्विटबद्दल काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध राहील, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडली. तर आधी जे म्हणत आलोय, तेच म्हणतोय, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपण संभाजीनगरवर पूर्णपणे ठाम असल्याचा संदेश काँग्रेसला दिला आहे.
संभाजीनगर-औरंगाबादवरून शिवसेना वि. काँग्रेस
औरंगाबाद शहराच्या नामांतरणावरून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात गेल्याच आठवड्यात राजकारण रंगले. मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद येथील वैद्यकीय खात्यासंदर्भात निर्णय झाला. याची माहिती देताना CMO च्या ट्विटर हँडलवरून मंत्री अमित देशमुख यांच्यासह संभाजीनगर (औरंगाबाद) असा उल्लेख केला होता. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत माहिती व जनसंपर्क विभागाला बजावले होते. मात्र त्यानंतरही CMO च्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विधानात संभाजीनगर म्हटल्याने CMO ने तोच शब्द ट्विटमध्ये वापरला होता.