खेळ तर आता सुरू, तुरुंगातून बाहेर येताच अर्णब गोस्वामींचे CM ठाकरेंना ‘आव्हान’ !

पोलीसनामा ऑनलाइन : वास्तुसजावटकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ( Anvay Naik Suicide Case ) अटकेत असलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना सर्वोच्च न्यायालयाने ( supreme-court) बुधवारी दिलासा दिला. न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला. गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींनाही जामीन दिला आहे. न्यायालयाने प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते. सुटका झाल्यानंतर गोस्वामी हे आपल्या न्यूज रूममध्येही पोहोचले. यावेळी पुन्हा त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट “उद्धव ठाकरे तुमचा पराभव झाला आहे,” असे म्हणत थेट मुख्यमंत्री ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांना आव्हान दिले आहे. खेळ तर आता सुरू झाला आहे. तसेच आता प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या न्यायपीठापुढे अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवरील सुनावणी पार पडली. अर्णब गोस्वामी यांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाकडून चूक झाल्याचे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटले आहे. वैयक्तिक स्वातंत्र्य नाकारताना उच्च न्यायालयाने योग्य कारवाई केली नसल्याचेही मत यावेळी न्यायालयाने नोंदवले आहे.

गोस्वामी म्हणाले, ठाकरे तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली आहे आणि माझी माफीही मागितली नाही. आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही आपली उपस्थिती आहे. तुरुंगाच्या आतूनही वाहिनी सुरू करेन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही, असे गोस्वामी यांनी आक्रमक होत म्हणाले. तसेच अंतरिम जामीन दिल्याप्रकरणी गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभारही मानले. दरम्यान, गोस्वामी यांना अंतरिम जामीन दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारला त्यांची जागा दाखवून दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सरकारने राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण केल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.