ग्रा. पं. निवडणुकीतील पराभवामुळे ठाकरे सरकारकडून वीजबील वसुली सुरु, फडणवीस यांची जोरदार टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळेच ठाकरे सरकारने वीजबिल वसुली सुरु केली आहे. सरकारने हजारो कोटींची सुट बिल्डर्संना दिली आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात सामान्य लोकांकडे रोजगार नव्हता. अशाववेळी सामान्य लोकांचे 4 पट जास्त अलेले बिल हे सुधरवण्याची गरज होती. मात्र असे न करता थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

डिसेंबरअखेर राज्यात 63 हजार 740 कोटी थकबाकी असून, आता जर ग्राहकांनी वीजबिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे महावितरणने म्हटले आहे. परिणामी वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयास दिले. महावितरणाच्या या धोरणावर फडणवीस यांनी टीका करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

कोरोना काळात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबरअखेरपर्यंत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या. डिसेंबरअखेर कृषिपंप ग्राहकांकडे 45 हजार 498 कोटी थकबाकी आहे. वाणिज्यिक, घरगुती, औद्याेगिक ग्राहकांकडे 8 हजार 485 कोटी व उच्चदाब ग्राहकांकडे 2 हजार 435 कोटी थकबाकी आहे. थकबाकीचा डोंगर वाढल्याने थकबाकी वसुलीसाठी जानेवारीपासून मोहीम राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले आहेत. ग्राहकांना वीजबिल हप्त्यामध्ये भरण्याची सवलत आहे. थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच थकबाकी वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्य होत नसल्याने, बँकांची व इतर देणी व कर्मचाऱ्यांचा पगार देणेही कठीण होत आहे, असे महावितरणने जाहीर केले आहे.