गडचिरोलीनंतर नक्षलवाद्यांचं ‘हे’ राज्य टार्गेट, आयबीकडून (IB) हाय अलर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरपाडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात राज्य पोलीस दलाचे १५ जवान शहीद झाले. या स्फोटाच्या पार्श्वभुमिवर गुप्तचर विभागाकडून (IB) उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील चांदौली, मिर्झापूर आणि सोनभाद्रा भागात माओवादी आयईडीचा स्फोट घडवू शकतात अशी माहीती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात हाय अलर्ट देण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांना नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक शहरात सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात आयईडी हल्ला होणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने उत्तर प्रदेश सरकारला दिली आहे. यामुळे उत्तर प्रदेशमधील मोठ्या शहरामध्ये बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी, त्याचबरोबर कोणताही वाईट प्रकार होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

शहीदांना आर्थिक मदत
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये १५ जवान शहीद झाले. शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत आदरांजली वाहिली. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या शहीदांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच शहीदांच्या कुटुंबातील एकाला नोकरी, शहीदाच्या नोकरीचा कालावधी संपेपर्यंत कुटुंबाला पगार, निवृत्त होईपर्यंतच्या कालावधीत सरकारी घर अशी मदत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.