Pune News : शरद पवारांनंतर अजित पवारांचा राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाणा, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत शेतकऱ्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विराट मोर्चा (mumbai farmers protest) काढला होता. या आंदोलनाला राज्यपालांनी भेट न दिल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी टीका केली होती. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेट न दिल्यामुळे राज्यपालांवर हल्लाबोल कला आहे. यावेळी अजित पवार यांनी शेतकरी मोर्चावर आपली भूमिका स्पष्ट केली. पुण्यात ध्वजारोहण सोहळ्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना २५ तारखेला भेटण्यासाठी ‘शेतकरी संघटनांनी वेळ मागितला होता. त्यानंतर राजभवनाकडून राज्यपालांचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, शेकडो किमी प्रवास करून शेतकरी-कष्टकरी मुंबईत आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा प्रमुख व्यक्तीने आपला पूर्व नियोजित दौरा बदलायचा असं ठरवलं आणि शेतकऱ्यांना प्राधान्य द्यायचे असं म्हणून दौरा पुढे ढकलू शकले असते. ‘राज्यपाल महोदय हे राज्यातील प्रमुख व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलणे हे माझ्या बुद्धीला पटत नाही, शेवटी लोकांनी पाहिलेलं आहे, असं अजित पवार म्हणाले.

राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले की, ‘सांगली, कोल्हापूरमध्ये रॅली सत्ताधारी पक्षाचे असो किंवा विरोधी पक्षाचे लोकं असू , मात्र आंदोलन करताना नियमांचे पालन केले नसेल त्यामुळे पोलिसांना नाईलाजाने गुन्हे दाखल करावे लागतात.’

राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी आम्ही यादी ही राज्यपालांकडे पाठवली आहे. आमचा अधिकार जो असतो त्यानुसार कॅबिनेट रीतसर ठराव करून ठराव पाठवला आहे, राज्यपालांनी याबद्दल लवकर निर्णय घ्यायला पाहिजे, त्यामुळे काही लोक वंचित राहत आहेत, अशी मागणी केली. तसंच ‘नवाब मलिक यांनी मेगाभरतीबद्दल आधीच सांगितले आहे. पण जेव्हा कुणी येईल, जर कुणाची घरवापसी असेल. याबद्दल मी सांगेन. परंतु, त्याविषयी कोणती चर्चा नसताना जर कुणी शिळ्या कढीला ऊत आणण्याचे काम करत असेल तर ते बरोबर नाही’ असा टोलाही अजितदादांनी लगावला.