शरद पवार यांच्यानंतर चंद्रकांत पाटील यांचं ‘या’ मुद्दावरून केंद्र सरकारला पत्र, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर केंद्र सरकारने आता दुसरा धक्का देत खतांच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. त्यामुळे याचे पडसाद कृषीक्षेत्राबरोबरच आता राजकीय वर्तुळातही उमटू लागले आहे. देशातील खतांची किंमत मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे पाप मोदी सरकारने केले आहे. वाढत्या किंमतीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री संदानंद गौडा यांना पत्र लिहले होते. पवार यांच्याबरोबरच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मंगळवारी (दि. 18) गौडा आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तौमर यांना पत्र लिहले आहे. खत उत्पादक कंपन्यांनी गेल्या काही दिवसात खताच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे पडणारा बोजा ध्यानात घेऊन शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी अनुदान द्यावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेली वर्षभर कोरोना आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच खत उत्पादक कंपन्यांनी खताची किंमत वाढविल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान होणार आहे. मान्सून काही दिवसांवर आला असून, शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. हे ध्यानात घेता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी लवकर अनुदान घोषित करावे, असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, असेही पाटील यांनी म्हटले आहे. भाजपाचे किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चहर यांनाही पाटील यांनी पत्र पाठविले असून, शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी अनुदान जाहीर करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.