निवडणुकांनंतर राष्ट्रवादी पुन्हा भाजपाला पाठिंबा देईन, आंबेडकरांचा इशारा

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेऊ नका. कारण निवडणुकीपूर्वी ते धर्मनिरपेक्ष असतात. पण, निवडणुका झाल्यानंतर ते धर्मनिरपेक्ष नसतात. कदाचित, निवडणुका झाल्यानंतर ते भाजपला पाठिंबा देतील, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांनी राज्यातील निवडणूक निकालावेळी घेतलेल्या भूमिकेची आठवण करून दिली.

देशाची अर्थव्यवस्था बिघडवली, देशात बेरोजगारी वाढली, तरीही लोक म्हणतात याला पर्याय नाही. पण, मोदीला बदलायचे असेल तर मोदींच्या विरोधातील पक्षाला आपण निवडून दिले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूकांपूर्वी धर्मनिरपेक्ष पार्टी असते. तर, निवडणुकांनंतर सेक्युलर पक्षांसोबत आपली तडजोड करतात. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच सरकार बनलं नसते, जर राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा जाहीर केला नसता. जर तुम्ही चुकून माकून राष्ट्रवादीला मतदान केलं, तर निवडणुकांनंतर राष्ट्रवादी भाजपवासी होईल असे प्रकाश आंबेडकर यांनी बीडमधील सभेवेळी बोलताना म्हटले.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी आणि अमित शहांविरुद्धची भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला तर झाला, असेही राज यांनी म्हटले. मात्र निवडणुकांनंतर राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिला तर मनसेच्या भूमिकेचे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.