‘राज्यात कृषी विधेयक मंजूर करणार नाही’ : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  केंद्र सरकारनं कृषी विधेयक मंजूर केल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. त्यामुळं आपल्या राज्याचा विचार करायचा झाल्यास महाराष्ट्रात हे विधेयक मंजूर करणार नाही. मात्र त्यापूर्वी तज्ज्ञांसोबत चर्चा करणार अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे. पुण्यात माध्यमांसोबत बोलताना यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

राज्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “एका बाजूला कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या. पुणे शहरात कोरोना रुग्णांचा दुप्पट होण्याचा कालावधी सद्य स्थितीला 60 दिवसांवर गेला आहे. यावेळी पुण्यात गणेश उत्सवानंतर कोरोना वाढला आहे.”अशी ग्वाही त्यांनी दिली.

नागरिकांनी शासनाकडून येणाऱ्या नियमांचं पालन आजवर प्रत्येक सण-उत्सवात केलं आहे. तसंच नवरात्र आणि दसरा या सणातही करावं असं आवाहन देखील अजित पवार यांनी केलं.

राज्यातील धार्मिक स्थळं केव्हा सुरू होणार यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “कोरोनाचा वाढता आकडा पाहता राज्य सरकार प्रत्येक नागरिकाचा विचार करून निर्णय घेत आहे. प्रत्येक गोष्ट ही टप्प्याटप्प्यानं सुरू होत आहे. आम्हालाही वाटतं धार्मिक स्थळं सुरू व्हावीत. परंतु कोरोनाची बाधा होऊ नये यादृष्टीनं आपण सावधपणे आणि टप्प्याटप्प्यानं निर्णय घेऊ” असंही ते म्हणाले.