Budget 2020 : शेतकर्‍यांचं उत्पन्न ‘दुप्पट’ करण्यासाठी मोदी सरकारचा 16 सुत्री कार्यक्रम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला दुसरा अर्थसंकल्प (2020-21) आज संसदेत सादर केला. सीतारामन यांनी यावेळी शेतकऱ्यांचा सर्वांगीन विकास करून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे सांगितले, यासंबंधित विशेष कृती योजना त्यांनी यावेळी जाहीर केली. या योजनांसाठी 2.83 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मोठ्या घोषणा –
1) 15 लाख शेतकऱ्यांना ग्रीड कनेक्टेड पंपसेटशी जोडले जाणार.
2) पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाण्याची कमतरता असलेल्या 100 जिल्ह्यांत काम केले जाणार.
3) पंतप्रधान कुसूम योजनेंतर्गत 20 लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात येणार.
4) नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले जाणार, जैविक शेतीसाठी एक पोर्टल तयार केले जाणार असून ऑनलाइन मार्केट मजबूत बनवले जाईल.
5) शेतकऱ्यांसाठी कृषी उडाण योजना सुरू केली जाईल, ही विमानसेवा कृषिमंत्रालयाकडून दिली जाईल.
6) दूध, मांस, मासे यांची साठवण आणि वाहतूक करण्यासाठी विशेष किसान रेल्वे धावणार.
7) केंद्राच्या मॉडेल लॉला लागू करणाऱ्या राज्यांना प्रोत्साहित करण्यात येईल.
8) उत्पादकता वाढवण्यावर भर दिला जाणार, रासायनिक खतांचा वापर कमी केला जाईल, रासायनिक खतांच्या संतुलित वापरासाठी माहिती दिली जाईल.
9) देशातील शेतकऱ्यांना सुमारे 15 लाख कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असून, त्यासाठी नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाणार, 2025 पर्यंत दुग्धउत्पादन दुप्पट करण्यासाठी सरकारी योजना चालवली जाणार.
10) देशात 162 दशलक्ष टन धान्य साठवण क्षमता आहे. आता नाबार्ड याला जीयोटॅग करेल. तसेच धान्य साठवणीसाठी गट आणि तालुका स्तरावर नवी कोठारे बांधली जातील. त्यासाठी राज्य सरकार जमीन देऊ शकते.
11) स्वयंसहायता गटांद्वारे गावात साठवण भांडारे उभारली जातील.
12) फायनान्सिंग ऑन निगोशिएबल वेअर हाऊसिंग स्कीम अधिक मजबूत केली जाईल.
13) फूड अँड माऊख आजार तसेच पीपीआर आजारांचे 2025 पर्यंत उच्चाटन केले जाईल.
14) सागरी क्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुढील आर्थिक वर्षांत मत्स्य उत्पादन 308 दशलक्ष टनपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य, 3077 सागर मित्र तयार केले जातील त्यातून किनारी भागातील तरुणांना रोजगार मिळेल.
15) दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत 58 लाख एसएचजी बनवण्यात आले आहे. त्यांना अधिक भक्कम केले जाईल.
16) 311 दशलक्ष टन उत्पादनासह अन्नधान्य उप्तादनात देश पुढे गेला असल्याने एक उत्पादन, एक जिल्हा योजनेस प्रोत्साहन दिले जाणार.