अहमदनगरमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत 3 सख्ख्या भावांसह चौघांचा निर्घृण खून !

नगर : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा येथे गांजा ओढण्यासाठी एकत्र आलेल्या आदिवासी तरुणांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत 3 सख्ख्या भावांसह चौघांचा खून झाला आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर नातेवाईक तरुणानंच तिघांचेही मृतदेह दुचाकीवरून घरी नेले. अहमदनगर-दौंड रस्त्यावर विसापूर फाटा आहे. याच भागात आदिवासी-पारधी समाजाची वस्ती आहे. गुरुवारी (दि 20 ऑगस्ट) सायंकाळी ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई केली.

नेमकं काय घडलं ?

समोर आलेल्या माहितीनुसार, सुरेगाव समाजातील काही तरुण गांजा ओढण्यासाठी एकत्र आले होते. काही कारणामुळं त्यांच्यात वाद झाला. काळे आणि चव्हाण कुटुंबातील असलेल्या या तरुणांमध्ये हाणामारी झाली. यात लिंब्या हरब्या काळे (वय 22), नातीक कुंजा चव्हाण (वय 40), नागेश कुंजा चव्हाण (वय 14), श्रीधर कुंजा चव्हाण (वय 35) यांचा मृत्यू झाला आहे. यातील तिघेजण सख्खे भाऊ आहेत. चाकू आणि कोयत्यानं वार करून हे खून झाले.

या घटनेनंतर एकजण आला आणि त्यानं खून झालेल्या तिघांचे मृतदेह दुचाकीवरून घरी नेले. हा तरुण त्या तिघांचा मावस भाऊ असल्याचं सांगितलं जात आहे. घटनास्थळी एक तरूण पडून होता. हल्लेखोर मात्र पळून गेले होते. काहींनी या घनटेचं गांभीर्य ओळखून याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर बेलवंडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह नगरवरून वरिष्ठ पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. सुरेगाव आणि परिसरात हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. आदिवासी वस्तीसह ग्रामस्थांकडेही पोलिसांची चौकशी सुरू आहे.

या भागात राहणाऱ्या लोकांच्या गटात नेहमीच असे वाद होत असतात. त्यामुळं जेव्हा काही ग्रामस्थांनी ही घटना पाहिली तेव्हा हा प्रकार नेहमीचा असावा असं त्यांना वाटलं. या भागात स्वस्तात सोनं देण्याचे आमिष दाखवून सापळा रचून फसवलेल्या व्यापाऱ्यांना लुटण्याचे प्रकार कायम होत असतात. यानंतर लुटमारीच्या मालावरून टोळीत आपापसात वाद होण्याच्या घटना होत असतात. हेच कारण होतं की, सुरूवातीला ग्रामस्थांनी याकडे कानाडोळा केला.