अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – देशभर सध्या इलेक्शन फिव्हर आहे. सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. निवडणुकांच्या प्रचाराला उधाण आले आहे मात्र प्रचार आणि इलेक्शनच्या नादात संवेदनशीलता खरंच कुठे गायब झाली आहे का ? अशी प्रचिती अहमदनगर मधील एका घटनेवरून आली आहे. भाजपचे अहमदनगरमधील उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना एका फोटोमुळे ट्रोलर्सच्या भडिमाराचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना विखेंनी पोझ दिल्याचा फोटो व्हायरल झाला. यावरून त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे.
नेमके काय आहे प्रकरण
राहुरीतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे त्यांच्या निवासस्थानी गेले. गाडे यांच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करतानाचा विखे यांचा फोटो व्हायरल झाला. विखे यांनी फोटोसाठी पोझ दिली असून, त्यांना परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचा आरोप करत त्यांना सोशल मीडियात ट्रोल करण्यात येत आहे. तसेच संवेदनशीलता हरपल्याची चर्चा होत आहे.
नगरची संस्कृती ही नाही..
निवडणुकीसाठी किती खालची पातळी गाठली जाऊ शकते हे भाजपचे नगरचे उमेदवार सुजय विखे यांनी दाखवून दिले. स्वर्गवासी झालेल्या जेष्ठ नेत्याच्या शेजारी उभे राहून विकृत फोटोसेशन साठी केलेली धडपड पाहून हेच मनात आलं "नगरची संस्कृती ही नाही"@satyajeettambe @bb_thorat pic.twitter.com/f8V120wQ3a— Hemant (@hemant44448888) April 3, 2019
गाडे हे राष्ट्रवादीचे नेते होते. त्यांच्या निधनाच्या दिवशीच काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचे उमेदवारी अर्ज दाखल करणे, शक्तिप्रर्दशन आणि प्रचारसभा असे कार्यक्रम सुरू होते. गाडे हे जगताप यांच्या प्रचारात सक्रीय होते. गाडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विखे त्यांच्या निवासस्थानी गेले; पण फोटोमुळे त्यांनाच ट्रोल व्हावं लागलं. गाडे यांचे निधन झाल्यानंतरही जगताप यांनी शक्तिप्रदर्शन आणि प्रचार सभा का सुरू ठेवली? असा प्रश्न उपस्थित करून जगताप यांच्यावरही टीका करण्यास सुरुवात झाली आहे.