…तर सर्वात पहिले न्यायाचेच Encounter होते, खा. ओवेसीचा योगी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  2017 मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच त्यांच्या विरोधात दाखल असलेले अनेक घटले मागे घेतले होते. आता ते त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या पाठीमागे उभे आहेत. जर सरकारच गुन्हेगारांचे झाले, तर सर्वात पहिले न्यायाचेच ‘एन्काउंटर’ होते, असे ट्विट करत ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी (AIMIM chief Asaduddin Owaisi) यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर हल्ला चढवला आहे.

मुझफ्फरनगर दंगलीशी संबंधित तीन भाजप आमदारांवरील गुन्हे मागे घेण्याची तयारी सुरू आहे. भाजप आमदारांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यासाठी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने अर्ज दाखल केला आहे. सरकारच्या या निर्णयावर खासदार ओवेसी यांनी योगी टीकास्त्र सोडले आहे.

तर दुसरीकडे बसपाच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी या मुद्द्यावर ओवेसींपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. मायावतींनी ट्विट करत, उत्तर प्रदेशात भाजपच्या नेत्यांवर राजकीय द्वेष भावनेतून दाखल केलेले गुन्हे परत घेण्याबरोबरच सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांवरही दाखल केलेले गुन्हे निश्चितपणे मागे घ्यायला हवेत, अशी आमची मागणी असल्याचे म्हटले आहे.