‘नियम फक्त ईदसाठी आहेत का ?, मग मोदींनाही राम मंदिराचं प्रतिकात्मक भूमिपूजन करायला सांगा’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकारने सर्व सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. तसेच साधेपणाने ईद साजरी करण्यात यावी, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम समुदायाला यासंदर्भात आवाहन केलं आहे. बकरी ईदसाठी शासनाकडून नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. मात्र ही निमयमावली अमान्य असल्याचे म्हणत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप नोंदवला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ईदसाठी ऑनलाइन खरेदी विक्री करण्यात यावी, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यावर जलील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ज्यांना शक्य असेल, ती मंडळी ऑनलाईन खरेदी, विक्री करु शकतील. पण एक,दोन जनावरं असलेल्या व्यक्तींनी काय करायचे ? नेते, अधिकारी याच्याकडे स्मार्टफोन असतात. गरिबांकडे ती सोय नसते. त्यांचा विचार कोण करणार ? जनावरं विकून दोन पैसे मिळवणाऱ्यांचा विचार कोणी करायचा, असे प्रश्न जलील यांनी उपस्थित केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेले नियम फक्त आमच्यासाठीच आहेत का, असा प्रश्न जलील यांनी विचारला आहे. गर्दी टाळण्यासाठी आम्हाला निर्देश देण्यात येतात. हेच नियम पंतप्रधान मोदींना लागू होत नाहीत का ? त्यांना देखील 5 ऑगस्टला राम मंदिराचा कार्यक्रम प्रतिकात्मक करायला सांगा. त्यांना दिल्लीतून प्रतिकात्मक भुमिपूजन करु द्या, अशा शब्दांत जलील यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून भाजपा आणि मोदींवर निशाणा साधला.