‘अकार्यक्षम ‘ कर्मचार्‍यांना सक्तीच्या विना वेतनाच्या रजेवर पाठवणार ‘Air India’, बोर्डनं दिली मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   एअर इंडिया (Air India) आपल्या कर्मचार्‍यांना 6 महिन्यांपासून 60 महिन्यांपर्यंत वेतनाशिवाय रजेवर पाठवण्याची तयारी करत आहे. यासाठी एअर इंडिया बोर्डची मान्यता मिळाली आहे. बोर्डाने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना एअर इंडियाच्या काही कर्मचार्‍यांना पगार न देता पाच वर्षांपर्यंत रजेवर पाठविण्याची शिफारस केली आहे. या योजनेअंतर्गत एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांना 6 महिन्यांच्या वेतनाशिवाय रजेवर पाठवल्यानंतर ते 60 महिन्यांपर्यंत म्हणजेच 5 वर्षांपर्यंत वाढविले जाऊ शकते.

पहिल्यांदा 2 वर्षे, नंतर 5 वर्षांपर्यंत वाढविली जाऊ शकते सुट्टी

अधिकृत आदेशानुसार एअर इंडियाचे सीएमडी राजीव बंसल आता कर्मचार्‍यांना सहा महिन्यांपासून दोन वर्षाच्या कालावधीसाठी रजेवर पाठवू शकतात. ते पुढे पाच वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते. असे म्हटले जात आहे की एअरलाइन संकटावर मात करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी ही योजना आणली आहे. एअर इंडियाने हे पाऊल अशा वेळी उचलले आहे, जेव्हा केंद्र सरकार एअरलाइन विकण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या एअरलाइनची विक्री प्रक्रिया कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे थांबलेली आहे.

कर्मचार्‍यांच्या कामगिरीचे मूल्यांकन तीन प्रकारे केले जाईल

आदेशात नमूद केले गेले आहे की, ‘व्यवस्थापनाला हा हक्क आहे की ते कोणत्याही कर्मचार्‍याचे मूल्यांकन करून विमानसेवेची गरज, आरोग्य आणि क्षमता पातळीवर आधारित पगाराविना रजेवर पाठवू शकतात.’ या योजनेच्या घोषणेनंतर एअर इंडिया मुख्यालयातील सर्व विभाग प्रमुख आणि प्रादेशिक कार्यालयातील प्रादेशिक संचालक या तीन मापांवरील प्रत्येक कर्मचार्‍याचे मूल्यांकन करतील. मूल्यांकनानंतर, विना पगारावर पाठविल्या जाणार्‍या कर्मचार्‍यांची यादी तयार केली जाईल. या यादीवर सीएमडीची मंजुरी मिळाल्यानंतर कर्मचार्‍यांना विनापगार रजेवर पाठविण्यात येईल.

कर्मचार्‍यांची यादी 15 ऑगस्टपर्यंत सीएमडीकडे सोपविली जाईल

व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची योग्यता, कार्यक्षमता, क्षमता पातळी, कामगिरीची गुणवत्ता, आरोग्याची स्थिती आणि सुट्टीच्या नोंदींचे मूल्यांकन करेल. यानंतरच कोणत्याही कामगारांना विना वेतन रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात येईल. प्रादेशिक संचालक व विभागीय प्रमुखांना ही यादी 15 ऑगस्टपर्यंत एअर इंडियाच्या सीएमडीकडे पाठविण्यास सांगण्यात आले आहे. एअर इंडियामध्ये सुमारे 13 हजार स्थायी कर्मचारी आहेत, त्यांच्या मासिक पगाराच्या 230 कोटी रुपये खर्च केले जातात. काम न करणाऱ्या कर्मचार्‍यांना विना पगारावर पाठवून ही कंपनी आपल्या रोख समस्येपासून मुक्त होईल.