मोदी सरकारनं सुरू केली Air India च्या विक्रीची प्रक्रिया, सप्टेंबरपर्यंत होणार पुर्ण

पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी विमान कंपनी Air India ही कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. त्यामुळे कंपनी बंद करून टाकणे अथवा ती विकणे हे दोनच पर्याय केंद्र सरकार समोर आहेत. त्यामुळे मोदी सरकारने Air India ची विक्री करण्यासाठी पावले उचलली आहेत. केंद्राने एअर इंडियाच्या विक्रीसाठी आर्थिक बोली मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा संपूर्ण व्यवहार सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Air India कंपनी सध्या तोट्यात असल्याने सरकारने कंपनीतील आपला 100 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या विक्रीसाठी सुरुवातीच्या बोली प्रक्रियेत खरेदीसाठी टाटा समुहानेही रस दखवला होता. प्रारंभिक निविदाच्या विश्लेषणानंतर पात्र निविदांना एअर इंडियाच्या व्हर्च्युअल डेटा रूममध्ये प्रवेश दिला होता. त्यानंतर गुंतवणूकदारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील, असे सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितले आहे. हा करार आता आर्थिक बोलीच्या टप्प्यात असून सप्टेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 2007 मध्ये या कंपनीचे डोमेस्टीक ऑपरेटर इंडियन एअरलाईन्ससोबत विलिनीकरण केले होते.

त्यानंतर ही कंपनी तोट्यातच आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या विक्री प्रक्रियेला विलंब झाला आहे. सरकारने सुरूवातीच्या टप्प्यातील बोली प्रक्रिया सुरू करण्याची मुदत 5 वेळा वाढवली होती. एअर इंडियाच्या खरेदीसाठी यशस्वीरित्या बोली लावणाऱ्यांना देशातील 4 हजार 400 विमानतळांवर आणि 1 हजार 800 आंतरराष्ट्रीय लँडिंग आमि पार्किंग स्लॉटसह परदेशातील 900 स्लॉटचे नियंत्रण मिळणार आहे. या लिलावात स्वस्त सेवा पुरवणाऱ्या लो कॉस्ट आर्म एअर इंडिया एक्स्प्रेस आणि AISATS चा 50 टक्के हिस्सादेखील सामील आहे.