ऐन सणाला विमान प्रवास महाग, 200 टक्क्यांपर्यंत वाढ ?

अहमदाबाद : वृत्तसंस्था – हवाई सफर करणारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या दिवाळीत हवाई सफर करण्याच्या तुमचा प्लॅन असेल तर नक्कीच खिशाला कात्री बसणार आहे.

 दिवाळी फेस्टिव्ह सीजनमध्ये विमान प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ पाहता विमान कंपन्यांनी याचा चांगलाच फायदा उठवला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई, दिल्ली, गोवा आणि बंगळुरु यासारख्या शहरांमध्ये जाण्यासाठी विमान तिकीट दरात 45 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय डेहराडून, जयपूर आणि बागडोगरा यांसारख्या पर्यटनस्थळी जाण्यासाठी विमान तिकीटात दुप्पट वाढ केली असल्याचे समजते आहे. इतकेच नाही तर अन्य काही ठिकाणच्या प्रवासासाठी 200 टक्क्यांपर्यंत तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे विमान तिकीट दरात करण्यात आलेली वाढ ही किरकोळ आहे  हितांग शाह यांनी सांगितले. हितांग शाह हे ट्रॅव्हल एजेंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या नॅशनल कमिटीचे सदस्य आहेत. ते म्हणाले, फेस्टिव्ह सीजनमध्ये विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे यामध्ये  तिकीट दरात वाढ करणे हे  स्वाभाविक आहे. त्यामुळेच तर  देशांतर्गत अथवा विदेशात प्रवास करण्यासाठी अॅडव्हान्समध्ये तिकीट बुकिंग करण्याचा सल्ला दिला जातो.
विशेष म्हणजे विमान तिकीट दर दुप्पट होण्यामागे तिकीट बुकिंग एजेंट आहेत अशी माहिती एका टूर ऑपरेटरने दिली आहे. तिकीट बुकिंग एजेंट आधीच ते सर्व तिकिटांची बुकिंग करतात. याचा परिणाम असा होतो की, या बुकिंगमुळे  विमानात कमी सीट उपलब्ध होतात. यामुळेच तर दरात वाढ होत जाते. इतकेच नाही तर विशेष म्हणजे एजेंट स्वत: तिकीटे चढ्या दराने विकतात आणि यातून चांगला नफा मिळवतात. परंतु वाढत्या तिकीट दराचा फटका हा केवळ आणि केवळ प्रवाशांनाच बसताना दिसतो. सणासुदीला प्रवास करणाऱ्यांची संख्या ही वाढताना दिसते.