२३ सप्टेंबरपासून राज्यात आयुष्मान भारत योजना, सुमारे ८४ लाख कुटुंबाची निवड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

 

महाराष्ट्रात येत्या २३ सप्टेंबरपासून आयुष्मान भारत योजना सुरू होणार आहे. राज्यातील सुमारे ८४ लाख कुटुंबाच्या पाच लाखांपर्यंतच्या वैद्यकीय खर्चाची हमी या योजनेच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. तसेच गेली सहा वर्षे दारिद्ररेषेखालील कुटुंबांना मोफत वैद्यकीय सुविधा देणारी राज्य सरकारची महात्मा फुले जनआरोग्य योजनाही सुरूच राहणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. २३ सप्टेंबर रोजी रांची येथून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे अनावरण होणार आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0924bf09-baff-11e8-b2d3-a17977384a66′]

राज्यातील सुमारे ८४ लाख कुटुंबाना आयुष्मान भारत योजनेचा फायदा होणार असून पहिल्या टप्प्यांमध्ये राज्य सरकार आणि पालिकाअंतर्गत येणारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांअंतर्गत ही योजना सुरू केली जाईल. आयुष्मान भारत योजनेमुळे राज्याच्या जनआरोग्य योजनेचे काय होणार, असा प्रश्न होता. कारण या योजनेत सुमारे दोन कोटी कुटुंबांना विम्याचे छत्र मिळत आहे. त्या तुलनेत आयुष्मान योजनेत कमी कुटुंबे सामावली जाणार आहेत. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा आयुष्मान भारत योजनेसाठी २३ राज्यांनी संमती दर्शविली असून २३ सप्टेंबर रोजी रांची येथून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे अनावरण करण्यात येईल. यामध्ये महाराष्ट्रानेही सहभाग दर्शविला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकार आणि पालिकेच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांचा यामध्ये समावेश केला जाणार असून पुढील टप्प्यांमध्ये खासगी रुग्णालयेदेखील सहभागी होतील. या योजनेसाठीची आर्थिक तरतूद केंद्राकडून ६० टक्के तर ४० टक्के राज्याकडून केली जाणार आहे.

आयुष्मान भारत योजनेसाठी शहरी भागातील ११ वर्गातील कुटुंबाचा समावेश केला आहे. यामध्ये कचरावेचक, भिकारी, घरकाम करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर आदी वर्गातील कुटुंबे समाविष्ट आहेत. ग्रामीण भागामध्ये घराची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमावत्या व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी आदी वर्गातील कुटुंबांची निवड केली आहे. केंद्र सरकारने २०११च्या जनगणनेनुसार निवड केलेल्या राज्यातील ८४ लाख कुटुंबांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून अद्ययावत माहिती नोंदविण्यात आली आहे. त्यांना बारकोड असलेले कार्ड दिले जाणार आहे. यात सरकारी रुग्णालयांमध्ये वर्षभरात पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील. जनआरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या ९७१ सेवांव्यतिरिक्त सुमारे ४०० आरोग्यसेवा या योजनेंतर्गत कुटुंबांना मोफत मिळणार आहेत. यामध्ये गुडघारोपण, खुब्याचे रोपण (हीप इम्प्लांट) आदी महागडय़ा आरोग्य सेवांचा फायदाही घेता येईल. विमा कंपन्यांसोबत संपूर्ण पाच लाखांचा विमा करार केल्यास हप्त्याची रक्कमही वाढेल. त्यामुळे मधला मार्ग निवडून सुमारे एक ते दीड लाखापर्यंतचा कुटुंबांचा विमा उतरविण्यात येईल. त्याच्यावर आरोग्यसेवेची गरज पडल्यास त्याचा खर्च  थेट राज्य सरकार देईल, असा विचारही सध्या सरकारकडून केला जात आहे.

वाढदिवस विशेष शबाना आझमी

राज्यातील ३६ जिल्ह्यात आयुष्मान भारत योजना राबविण्यात येणार असून ग्रामीण भागातून सुमारे ५८ लाख आणि शहरी भागातून सुमारे २४ लाख कुटुंबांची निवड केली आहे. ग्रामीण भागामध्ये जळगाव (३,६९,८०९), नाशिक (३,४१,७२७), यवतमाळ (३,३९,२२६) या जिल्ह्यांमधील सर्वाधिक कुटुंबाची निवड केली आहे. शहरी भागामध्ये सर्वाधिक कुटुंबांची निवड मुंबई उपनगर (३,३१,१२६), पुणे (२,७७,६३३) आणि ठाणे (२,६५,२९३) भागांमधून केली आहे.