चंद्रकांत पाटलांच्या टीकेला अजित पवारांचे उत्तर, म्हणाले -‘खोट्या प्रसिद्धीसाठी धडपणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दोन दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. झोप कमी करावी, झेपत नसेल तर पुण्याचे पालकमंत्री पद सोडावं, असा सल्ला दिला होता. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करुन खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतर बरळल्याशिवाय टीव्हीवर दिसू शकत नाही, अशी लोकं माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

तर आरोप करण्याची हिंमत झाली नसती

अजित पवार पुढे म्हणाले, मी नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनीधी मला भेटतात हे पहावे. मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती तर माझ्यावर असे बिनबुडाचे आरोप करण्याची हिंमत झाली नसती, असा टोला त्यांनी लगावला. तसेच टीव्हीवर चमकण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी बिनबुडाचे आरोप करुन राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करुन या संकट काळात राज्याला कमकुवत करण्याचे पाप करु नये, असा इशारा अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना दिला.

हेतू व मेंदू तपासण्याची आवश्यकता

चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांचा समाचार घेताना अजित पवार म्हणाले, मी दररोज सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष भेटींना उपलब्ध असतो, मुख्यमंत्री, मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत दिवसभर संपर्कात असतो. तसेच भाजपचे आजी माजी आमदार, नेते मंडळी भेटत असतात. ते देखील मला दिवसभर फोन करतात. सोमवार ते गुरुवार सकाळी नऊ वाजता मंत्रालयात हजर असतो तर पुण्यामध्ये शुक्रवार ते रविवार हजर असतो. मागील दीड वर्षापासून हा माझा कार्यक्रम सुरु आहे. कायम लोकांच्या संपर्कात राहणारा कार्यकर्ता आहे. जनतेत आणि मंत्रालयात उपस्थित असताना ‘अजीत पवार नेटवर्कबाहेर’ असल्याचा आरोप करणाऱ्यांचा हेतू आणि मेंदू तपासण्याची आवश्यकता आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी सुनावलं.

भाजपने त्यांचा वेळ व ताकद केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी वापरावी

भाजपचे नेते खोटे-नाटे आरोप करुन राज्यातील कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत करत आहेत. त्यांची वक्तव्ये ही राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करुन राज्याला अडचणीत आणणारी आहेत. भाजप नेत्यांनी त्यांचा वेळ आणि ताकद केंद्रकडून राज्यासाठी जास्तित जास्त मदत मिळवून देण्यासाठी वापरावी, ते जनतेच्या हिताचे ठरेल, असे अजित पवार म्हणाले.