मोदींच्या लाटेवर आलेल्यांनी लावली फक्त ‘वाट’ : अजित पवार

भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर लोकसभा मतदार संघाच्या प्रचारार्थ भोसरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने दुखावलेल्या कार्यकर्त्यांनी विलास लांडे यांच्या नावाने घोषणा देत काहीवेळ गोंधळ निर्माण केला, मात्र शिरूर मतदारसंघाचा उमेदवार शरद पवार व पक्ष प्रमुख ठरवतील, तर 2009 च्या निवडणूकीत कुठे होता तुम्ही ? असा खडेबोल सवाल यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केला.

मातंग समाजाच्या तरूणांवर जल समाधी घेण्याची वेळ आलीय, तर तरूण बेरोजगारांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातूनच गुन्हेगारीत वाढ होत आहे. मोदीजींच्या लाटेवर निवडूण आलेल्या भाजपा सरकारनं फक्त वाट लावण्याचं काम केलं आहे. एकवेळ आशियात बेस्ट व श्रीमंत असं नावलौकीक असलेल्या पिं.चिं. महानगरपालिकेची काय अवस्था झाली आहे, हे सर्वांनाच दिसतंय. खोट बोलण्यात पटाईत व केवळ गाजर दाखविण्यात भाजप सरकार स्मार्ट आहे, अशा शेलक्या शब्दात अजित पवार यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनावर टीका केली.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे, डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेता दत्ता साने, देवदत्त निकम, नगरसेवक जालिंदर शिंदे, वसंत लोंढे आदी उपस्थित होते.