राज ठाकरेंवर भाजपची टीका ; उत्तर दिलं अजित पवारांनी !

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – यंदा लोकसभेत मनसेने अप्रत्यक्षरित्या पाऊल ठेवलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आघाडीच्या बाजूने आपला प्रचार करत आहेत. त्यांच्या या प्रचारावर भाजपने जोरदार टीका केली. त्यावरून भाजपला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांच्याकडे सभा घेण्यासाठी पैसे कुठून येतात या विचाराने भाजपवाले डोकं खाजवतात. राज ठाकरेंच्या सभेला लोक येतात, तुमच्या येतात का? तुमच्या सभा ऐकायला लोकांनी आलं पाहिजे म्हणता, पण दुसर्‍यांच्या सभेला लोक जमले की तुमच्या पोटात दुखतंय. तुम्हाला सोड्याची बाटली द्यावी लागते, असं अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवार यांची काल इंदापूरात सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे पाच वर्षांपूर्वी आमच्याविरोधात सभा घ्यायचे, मोदींचे समर्थन करायचे, आम्ही यावर प्रश्न उपस्थित केला का? ते कुठून पैसे आणतात विचारलं का? असं अजित पवारांनी यावेळी विचारलं. कोल्हापूर इथे शिवसेनेची पहिली सभा झाली. या ठिकाणच्या सभेला जमलेल्या महिलांना मराठी बोलता येत नव्हते, त्या कर्नाटकमधून आणल्या होत्या.  यांच्या सभेला आता लोक जमत नाहीत. हवा बदलायला लागली आहे. त्यामुळे त्यांना वाईट वाटायला लागलं आहे. लोकशाही आहे, आम्ही ती खुल्या मनाने स्वीकारली आणि विरोधकांची भूमिका घेतली. मात्र आता हे लागलेत गाजर दाखवायला, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. तसंच ईव्हीएम मशीनवरही त्यांनी यावेळी वक्तव्य केले.

मायावतीसह सर्वच जण EVM मध्ये बिघाड होतोय असे सांगतात. खरं तर ईव्हीएम हे अमेरिका सुद्धा आता चालवत नाही. ईव्हीएममध्ये जरा गडबडच वाटत असून, आपणही मतदान करताना अगोदर चेक करा, नाहीतर बटण दाबताच ते तिसरीकडेच मतदान व्हायचे, असं मिश्किल पण सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.