संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही – अजित पवार

पोलीसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 17 जानेवारी : बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमा भागातील सर्व मराठी भाषिक गावे महाराष्ट्र राज्यात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचं मराठी गाव महाराष्ट्र राज्यात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणे, हीच या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केलं.

आज हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलं. यावेळी ते बोलत होते.

आजच्याच दिवशी, कर्नाटकातील बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालीन म्हैसूर राज्याला अन्यायकारक पद्धतीने जोडली. त्यावेळी सीमाभागातील मराठी बांधवांवर आणि महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा लढा अखंड सुरुय. हा लढा यशस्वी होईपर्यंत समस्त मराठी बांधव सर्वशक्तीनिशी, एकजुटीने लढतील, असे सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

तसेच, संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणार्‍या आंदोलकांवर, 18 जानेवारी 1956 रोजी मुंबईमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्राचे 10 सुपुत्र शहीद झाले, तर 250 हून अधिक जखमी झाले होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्या त्या महाराष्ट्रवीरांनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले आहे.

याशिवाय, आंदोलनामध्ये जखमी झालेल्या सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांबद्दलही उपमुख्यमंत्री पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केलीय. कर्नाटक सीमाभागातील मराठी गावे महाराष्ट्र राज्यात आणून संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही, असा निर्धारही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय.

सीमा लढ्यातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन – मुख्यमंत्री ठाकरे
आज हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटद्वारे अभिवादन केलं. महाराष्ट्र राज्यात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणार्‍या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन!. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग तसेच समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबीयांना मानाचा मुजरा!, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

याशिवाय, कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह हूतात्म्यांना विनम्र अभिवादन, असे दुसर्‍या एका ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही -शिंदे
बेळगाव सीमा भागातील हुतात्म्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये दिलेले बलिदान कदापि वाया जाणार नाही. जोपर्यंत बेळगाव आणि सीमा भाग महाराष्ट्रात येईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलंय.