अजित पवारांचा थेट भाजपाला प्रश्न ! उपमुख्यमंत्री म्हणाले – ‘भाजपाची मक्तेदारी आहे का ? आम्हाला काही कळतच नाही का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोमवारी वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. तर यावरून विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. अर्थसंकल्पातील अनेक योजना ह्या भाजप काळातील आहे. अशी टीका विरोधक करत आहेत. तर हा राज्याचा अर्थसंकल्प आहे की मुंबईचा? अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. याबाबत अजित पवार यांना विचारले असता पवार हे विरोधकांवर चांगलेच भडकले आहेत.

यावरून अजित पवार म्हणाले की, शून्य टक्के व्याजाची घोषणा भाजपाची नाही. भाजपाची काय मक्तेदारी आहे का? आम्हाला काही कळतच नाही का? त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही काय साधूसंत नाही. जनतेला सरकारबद्दल आपलेपणाची भूमिका वाटावी, हे आमचं काम आहे. आम्ही असा कार्यक्रम देणार जो जनतेला आवडला पाहिजे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेनं आमचा विचार केला पाहिजे. नांदेड, पुणे, ग्रामीण भागातल्या रस्त्यांचा कार्यक्रम हे मुंबई महापालिकेत आहे का? मुंबई ही देशाची राजधानी आहे. तिच्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे, अशा शब्दात अजित पवार विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, मी काय आज अर्थसंकल्प मांडत नाहीये. २००९ पासून ४ अर्थसंकल्प सादर केले आहे. जयंत पाटील, सुनील तटकरे यांनीही सादर केले आहे. अर्थसंकल्प मांडणं हे आमच्यासाठी नवीन नाही. यावेळी आमच्या सर्वांच्या पुढं आव्हान होतं. करामधून येणारा पैसा कमी झाला आहे. केंद्राकडून अजूनही ३२ हजार कोटी बाकी आहेत. आम्ही आमच्या बाजूने सर्व घटकांना सोबत घेऊन बजेट मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पेट्रोल डिझेलवर केंद्र सरकारने कर कमी केले पाहिजेत. मनमोहन सिंहांच्या काळात प्रति बॅरलचा दर किती होता आणि आता किती आहे हे ही त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. वजा ८ टक्के विकासदर असताना आम्हाला जितकं सर्वाना सामावून घेता येईल ती भूमिका आम्ही घेतली आहे. तसेच हे सारखे म्हणतायत की आम्ही विदर्भ, मराठवाडा विकास महामंडळं केली नाहीत. आम्ही म्हटलं आम्ही करणार आहोत. तसेच त्यांनाच विदर्भाची काळजी आहे, मग आम्ही काय बिन काळजीचे आहेत का? असा थेट प्रश्न त्यांनी विरोधकांना केला आहे.