अजित पवारांचा PM मोदींना टोला ! म्हणाले – ‘ती भावुकता शेतकऱ्यांच्या बाबतीतही दाखवा’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा बैठक घेत आहेत. ते बुधवारी नाशिक जिल्ह्यात होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या संसदेत झालेल्या भाषणावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी यांनी जो भावुकपणा काल संसदेत दाखवला, तोच भावुकपणा त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला तर बरं होईल, असं अजित पवार यांनी टोला लगावला.

राज्यसभेचा कार्यकाळ संपलेल्या सदस्यांना निरोप देताना मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले होते. काँग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधानांना अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या या भाषणाची चर्चा काल देशभरातील माध्यमांमध्ये होती. यावरूनच अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.

दरम्यान, गेले तीन महिन्यांपासून हजारो शेतकरी आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करत आहेत. दोन्ही बाजूंनी दोन-दोन पावलं मागे येऊन यावर तोडगा काढायला हवा, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.