शरद पवार मराठवाडयाच्या दौर्‍यावर तर अजितदादा पंढरपुरात

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोनाचा सामना करता करता महाराष्ट्रावर आता अजून अनेक संकट आले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. विठुरायाच्या पंढरपूरमध्ये तर पाण्याचा जणू महापूरच आला आहे. पंढरपुरातील शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पंढरपूर दौरा करण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे वयाच्या 80 व्या वर्षी उस्मानाबादचा दौरा करणार आहेत. त्यांच्यापाठोपाठ आता त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यामंत्री अजित पवार हे सुद्धा इंदापूर तालुक्यातील पूरग्रस्त ठिकाणांची पाहणी करून पंढरपूर दौऱ्यावर जाणार आहे.

मागील 3 दिवसांपूर्वी झालेली अतिवृष्टी, धरणांमधून सोडण्यात आलेले पाणी, यामुळे भीमा नदीची पातळी वाढून नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरले होते. भीमा नदीच्या रूद्रावताराने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली होती. नृसिंहपूर संगम येथील भीमेचा विसर्ग 56 हजार तर पंढरपूरमध्ये नदीचा विसर्ग 2 लाख 13 हजार क्युसेक इतका आहे. सखल भागातून पाणी कमी होऊ लागले आहेत. दरम्यान नवीन व अहिल्या पुलावरील पाणी ओसरले असले तरी या पुलांचे आँडिट बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. यानंतरच ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील. गोपाळपूर पुलावर अद्याप पाणी साचले आहे.

भीमेच्या पाण्यामुळे भीमाकाठी माढा, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा या तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर तालुक्यात 16 हजार लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. कौठाळीसह अन्यत्र रेस्क्यू टीम पाठवून लोकांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. अतिवृष्टी व धरणांचे पाणी यामुळे भीमा नदीची पातळी खूपच वाढली होती मात्र आता पाणी हळू हळू ओसरू लागले आहे.