मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात एक नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ईन्शाल्ला या भन्साळींच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता सलमान खान ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. २७ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी ऑनस्क्रीन रोमान्स करण्यावर नेटकऱ्यांनी आलियावर टीका केली होती. काही नेटीझन्स सलमान आणि आलिया यांची जोडी खटकल्याचे दिसत आहे. परंतु या टीकाकारांना आलियाने सडेतोड उत्तर दिले आहे. मला लोकांच्या टीकेने काही फरक पडत नाही असे ती म्हणाली आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.
यावेळी बोलताना आलिया म्हणाली की, “भन्साळींच्या चित्रपटासाठी मी फार उत्सुक आहे. लोकांनी या चित्रपटाबाबत काही वक्तव्य करणं म्हणजे एक प्रकारे हादेखील त्यांच्या उत्सुकतेचा भाग आहे. लोकांनी तर्कवितर्क लावण्यात काही चुकीचं नाही आणि मला त्याने काही फरक पडत नाही. सलमान आणि भन्साळी यांनाही काही फरक पडत असेल असं मला वाटत नाही.” असे आलिया म्हणाली.
पुढे बोलताना आलिया म्हणाली की, “संजय लीला भन्साळी यांनी बॉलिवूडला एकाहून एक दमदार चित्रपट दिले आहेत. त्यांच्या चित्रपटांचे बरेच चाहते आहेत. त्यांच्या कामावर विश्वास ठेवला पाहिजे असे मला वाटते.” असेही तिने स्पष्ट केले. याशिवाय, भन्साळींसोबत काम करण्याचं माझं स्वप्न होतं असेही आलिया म्हणाली.
हम दिल जे चुके सनम या चित्रपटानंतर सलमान आणि आलिया यांनी एकत्र काम केलं नव्हतं. भन्साळी यांच्या आगामी ईन्शाल्ला या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि आलिया हे दोघे तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत.