सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने 24 तास उघडे ठेवण्यास सरकारची परवानगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता या व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपया योजना आखल्या जात आहेत. दुकानांमध्ये होणाऱ्या गर्दीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं 24 तास सुरु ठेवण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. दुकानांमध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी आणि त्यामुळे संसर्गाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.


लॉकडाऊनच्या काळात सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. आज वर्षा बंगल्यावर कोरोना उपाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत दुकाने 24 तास उघडी ठेवण्यावर चर्चा झाली.

लॉकडाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात असेही या संदर्भात झालेल्या बैठकीत ठरले आहे.