शेतकरी आंदोलन : उद्याच्या भारत बंदमध्ये सर्व विरोधी पक्ष उतरणार, देशातील 400 संघटनांचा सहभाग

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 8 ) पुकारलेल्या भारत बंदमध्ये काँग्रेससोबतच तृणमूल, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय लोक दल, राष्ट्रीय लोक समता पार्टी (रालोसपा), समाजवादी पक्ष तसेच डावे पक्ष आदी विरोधी पक्ष सामील होणार आहेत. शेतकरी संघर्ष समन्वय समितीत देशभरातील 400 शेतकरी संघटनांचा सहभाग आहे. बंदमध्ये माकप, भाकप, सीपीआय (एमएल), रेव्होल्युशनरी सोशॅलिस्ट पार्टी (आरएसपी), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आदी पक्षही सहभागी होणार आहेत. त्यामुळे मोदी सरकारची मोठी कोंडी होणार आहे.

पाठिंबा देणारी राज्ये व सत्ताधारी पक्ष
महाराष्ट्र : शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, काॅंग्रेस, पंजाब : काँग्रेस, पश्चिम बंगाल : तृणमूल काँग्रेस, राजस्थान : काँग्रेस,
नवी दिल्ली : आम आदमी पक्ष, छत्तीसगड : काँग्रेस, झारखंड : झारखंड मुक्ती मोर्चा, केरळ : डावी आघाडी

विजेंदरचा खेलरत्न परत करण्याचा इशारा; कलाकारांकडून समर्थन
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आपणास मिळालेला खेलरत्न पुरस्कार परत करू, असे बॉक्सर विजेंदरसिंग यांनी जाहीर केले आहे. आंदोलनाला सोनू सूद, अभिनेत्री तापसी पन्नू, ऊर्मिला मातोंडकर, रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, बॉक्सर विजेंदर सिंग, क्रिकेटपटू हरभजनसिंग आदींनी पाठिंबा दिला आहे. अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ यांनी आंदोलनाला पाठिंबा देत निदर्शकांना उबदार कपड्यांसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची देणगीही दिली आहे.

पवार लवकरच राष्ट्रपतीची भेट घेणार
शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने न सोडवल्यास देशभरातील लोक या आंदोलनात उतरतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शरद पवार लवकरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत.