पश्चिम महाराष्ट्रात ‘इतक्या’ जागा युती जिंकणार : चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुका पार पडत नाही तोच सत्ताधारी आणि विरोधकांकडून आमचीच सत्ता येणार असा दावा केला जात आहे. महाराष्ट्रात देखील महायुतीकड़ून आम्ही ४२ ते ४५ जागा जिंकू असा दावा करण्यात येत आहे. त्यात आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील वक्तव्य केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील १० पैकी १० जागा भाजप-शिवसेना युती पटकवणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे केंद्रात भाजपला २९० तर राज्यात युतीच्या ४४ जागा येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. चंद्रकांत पाटील हे आज जळगाव जिल्ह्याच्या दुष्काळ दौऱ्यावर होते. यावेळी ते बोलत होते.

महायुतीला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळेल हे कोऱ्या कागदावर लिहून घ्या किंवा याबाबत पैज लावालयलाही तयार असल्याचे देखील चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. त्यामुळे आता २३ तारखेला या सगळ्यावर लोकांचे लक्ष असणार हे नक्की.
दरम्यान या १० जागांमध्ये पुणे, बारामती, मावळ, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या महत्वाच्या जागांचा समावेश असल्याचे देखील त्यांनी आवर्जून सांगितले.