परमबीर सिंहांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांवर सरकारची वक्रदृष्टी? पोलीस दलात बदल्यांचे सत्र सुरूच

ठाणे: पोलीसनामा ऑनलाइन – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या वसुलीच्या आरोपामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले होते.अद्यापही टांगती तलवार असून आघाडीची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यातच आता सरकारची वक्रदृष्टी परमबीर यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांवर गेली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून पोलीस दलात बदल्यांचे सत्र सुरु आहे.
काही दिवसापूर्वी मुंबईतील काही अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये ठाण्यातील खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांचाही समावेश होता.

हि घटना ताजी असतानाच गेल्या आठवड्यात ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अन्वेषण शाखा घटक क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची बदली करण्यात आली. वरिष्ठांकडे गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आणि वादग्रस्त पार्श्वभूमी असलेले मोजके अधिकारी वगळता उर्वरित अधिकाऱ्यांच्या बदलीचे खास प्रयोजन नव्हते. केवळ परमबीर सिंह यांच्यासोबत कधीकाळी काम केल्याने त्यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. आणि हीच ओळख आता त्यांना भोवली आहे. परमबीर सिंह यांच्या संपर्कातही दीर्घ काळापासून यातील बरेच अधिकारी नव्हते. त्यामुळे बदल्यांमुळे परमबीर सिंह यांना त्रास होईल, अशातलाही भाग नाही.

गुन्हे अन्वेषण शाखेचे कामकाज सांभाळताना नितीन ठाकरे यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणून ठाणे पोलिसांचा नावलौकिक उंचावला. यामध्ये बोगस कॉल सेंटरपासून लष्कराच्या पेपरफुटीपर्यंतचे, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही प्रकरणांचा उलगडा त्यांनी या काळात केला. त्या वेळी योगायोगाने ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे होते. आता परमबीर सिंह यांच्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याने, सरकारने काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात नितीन ठाकरे यांची बदली नंदुरबार येथे जात पडताळणी समितीमध्ये केली आहे. अधिकाऱ्यांच्या बदलीकडे केवळ कारवाई म्हणून नव्हे, तर व्यवस्थेची गरज म्हणूनही प्रशासकीय वर्तुळात बघितले जाते. मात्र, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बदली थेट नंदुरबार येथे आणि तीही पालक शाखेतून काढून दुय्य्म शाखा असलेल्या जात पडताळणीसारख्या विभागात केल्यास योग्य संदेश जात नाही. पोलीस दलात अस्वस्थता निर्माण करणारी सरकारची ही भूमिका आहे.

अधिकाऱ्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेचे काय?
सरकारी नोकरी म्हंटल कि कधी ना कधी बदली बदली होणारच. त्यामुळे अधिकाऱ्यांची बदलीची मानसिकता असते. मात्र सध्या सरकारने जे बदल्यांचे सत्र सुरु केले आहे त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या बदल्या परमबीर सिंह यांनी सरकारवर आरोप केल्यानंतर झाल्या आहेत. सचिन वाझे किंवा मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तर या अधिकाऱ्यांचा संबंध नाही, अशा संशयाने त्यांच्याकडे बघितले जात आहे. या अधिकाऱ्यांसाठी बदलीपेक्षा सामाजिक प्रतिष्ठेची झालेली हानी जास्त त्रासदायक ठरत आहे.