तुमच्यावरील आरोपामुळे आमची प्रतिमा मलिन होतेय, कॉंग्रेसच्या नेत्याने शिवसेना अन् राष्ट्रवादीला सुनावलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे काँग्रेसची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप मुंबई प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस विश्वबंधू राय यांनी केला आहे. पक्षश्रेष्ठींनी वेळीच याबाबत कठोर निर्णय घ्यावा. तसेच महाविकास आघाडीमध्ये विश्वास आणि सामंजस्याचा अभाव असल्याचे म्हणत त्यांनी थेट कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहले आहे.

भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील सत्ता हातात घेऊन एक वर्षाचा अवधी उलटून गेला आहे. वर्षभराच्या कारभारानंतर आता महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या कारणावरून धूसफूस सूरू झाली आहे. त्यातच आता मुंबई प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस राय यांनी पक्षाच्या हायकमांडना पत्र लिहल्याने आघाडीत वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

राय यांनी पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांची उपेक्षा होत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमुळे काँग्रेस आणि जनतेचे नुकसान होत आहे. त्यामुळे या सरकारमध्ये कायम राहण्याचे कुठलेही औचित्य दिसत नाही. ही आघाडी काँग्रेससाठी नुकसानकारक दिसत आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचा मित्रपक्षांच्या चुकांचा फटका बसू शकतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि त्याच्या कार्यकर्त्यांचे भविष्य पाहून पक्षश्रेष्ठींनी कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे विश्वबंधू राय यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.