अण्णांचा ‘पलटवार’ ! पैशाने मंत्रिपद कधी मिळत नसतं, हा केवळ ‘बालिशपणा’ : जयदत्त क्षीरसागर

बीड : पोलिसनामा ऑनलाईन – शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी  काँग्रेसचे नेते संदीप क्षीरसागर यांनी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर 50 कोटी रुपये देऊन मंत्रिपद घेतल्याचा आरोप केल्यानंतर आता मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जयदत्त क्षीरसागर यांनी या आरोपांवर बोलताना म्हटले आहे कि, पैशाने मंत्रिपद कधी मिळत नसते, हा केवळ बालिशपणा असून तो जनतेसमोर आलेला आहे. त्याचबरोबर नशेत बोलणाऱ्यांचे आरोप मी फार गांभीर्याने घेत नाही, असा टोलादेखील त्यांनी संदीप क्षीरसागर याना लगावला.

राष्ट्रवादीचे नेते आणि जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा बीडमध्ये आली असता जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी यावर उत्तर देताना हे आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.

आयुष्यात चरित्र आणि चारित्र्याला महत्त्व’

या आरोपांवर पुढे बोलताना मंत्री जयदत्त क्षीरसागर  म्हणाले कि, मी माझ्या राजकीय जीवनात चरित्र आणि चारित्र्याला महत्त्व देत आलेलो आहे. मी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संधी दिलेली आहे. त्यामुळे अशा आरोपांवर स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटत नाही. त्यामुळे हे आरोप म्हणजे केवळ बालिशपणा असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

राजकारण म्हणजे पोरखेळ सुरु आहे

संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका करताना पुढे ते म्हणाले कि, माझे कपडे फाडू असे म्हणणाऱ्या लोकांना स्वतःचे कपडे काढून फिरण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर सध्या राजकारण म्हणजे पोरखेळ सुरु असून माझ्या आयुष्यात चरित्र आणि चारित्र्याला महत्त्व असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.