आज होणार ‘युती’चा फैसला

 मुंबई : वृत्तसंस्था 

देशातले वातावरण बदलत आहे. २०१४ चा राजकीय अपघात २०१९ मध्ये होणार नाही, अशा शब्दांमध्ये शिवसेनेकडून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. महाराष्ट्रावर शिवसेनेची स्वबळावर सत्ता येईल आणि दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचं, याचा निर्णय घेणारी ताकद राष्ट्रीय पातळीवर शिवसेना निर्माण करेल, अशी गर्जनादेखील ‘सामना’मधून करण्यात आली आहे. आज शिवसेनेचा ५२ वा वर्धापनदिन आहे.

देशातील परिस्थिती चांगली नसल्याचे शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटले आहे. ‘देशात आज आणीबाणीपूर्व परिस्थिती आहे काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काश्मीरात जवानांच्या हत्या होतच आहेत. लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारचा गळा राजधानी दिल्लीतच आवळला जात आहे. नोकरशाहीचा हम करे सो कायदा सुरूच राहिला तर निवडणुका लढणे व राज्य चालवणे मुश्कील होईल. धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे, तर देशभरातच उठले आहेत. मोदी हे सतत परदेशात असल्याने त्यांच्या डोळ्यात व श्वासात धुळीचे कण जात नसावेत, पण जनता बेजार आहे. अडचणीत आहे,’ अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं भाजपावर शरसंधान साधले आहे.

मुंबईतील अनेक भागांची नाव बदलून मुंबई नासवण्याचे काम सुरू असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. पैसा व सत्तेचा विषप्रवाह मुंबईसह महाराष्ट्राचे रूप बदलू पाहत आहे. मुंबई नासवण्याचं कारस्थान रचले आहे. ‘बॉम्बे’ चे ‘मुंबई’  केले याची पोटदुखी असणाºयांना मुंबईतील अनेक नगरे-उपनगरांची नावे परस्पर बदलण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या पाठीवर धपाटा मारला जाईल. परळ, दादर, गिरगाव, वडाळा व शीव, भायखळा, चिंचपोकळी ही त्याच नावानं ओळखली जातील. ज्यांना या गावांची नावं बदलून अप्पर वरळी, न्यू कफ परेड वगैरे करून बाजार मांडायचा आहे, त्यांनी आधी आपल्या बापांची नावे बदलून यावे,’ अशी खरमरीत टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर २०१९ ला पुन्हा युती होणार, शिवसेनेला केंद्रात व राज्यात आणखी काही खाती देणार अशा बातम्या झळकल्या होत्या़ त्यात सोमवारी महाराष्ट्राचे भावजी म्हणून ओळख निर्माण झालेल्या व सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर झाल्याने युतीसाठी पुन्हा जुळवा जुळवी सुरु झाली, अशा चर्चा झडू लागल्या़ पण, सामना तील या अग्रलेखात शिवसेनेचा सूर पाहता युतीच्या आशा मावळल्या आहेत. दुसरीकडे संजय राऊत हे युतीच्या विरुद्ध असल्याने ते अनेकदा आपली मते मांडतात़ त्याला शिवसेना पक्षप्रमुखांचा संपूर्ण पाठिंबा असतोच असे नाही़ साहेबांनी हे वेळोवेळी स्पष्ट केले असल्याचा दावा शिवसेनेचे काही खासदार करीत असल्याने अजूनही शिवसेनेचा नेमका मुड काय आहे, हे लक्षात येत नाही त्यामुळे वर्धापन दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे तो मुड स्पष्ट करतील असे वाटत आहे.