15 वर्षांपासून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास, रस्ता बांधला, पण नदीवर पूल बांधायलाच विसरले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तराखंडच्या ( Uttarkhand) एका गावामध्ये सरकारी कामाच्या गोंधळाचा गावकऱ्यांना चांगलाच फटका बसलेला पाहायला मिळत आहे. या गावातील गावकऱ्यांना मागील १५ वर्षांपासून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. उत्तराखंडमधील सोमेश्वर विधानसभा ( Someshwar Assembly) क्षेत्रामधील लोकांना सरकारी कामातील बेजबाबदारपणाचा फटका बसला आहे. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने ताकुला ते सोमेश्वर असा रस्ता तर तयार केला आहे. पण रस्ता तयार करताना नदीवर पूल बांधलेला नाही. या नदीवर पूल ( Bridge) नसल्याने स्थानिकांना रोज जीव मुठीत घालून नदी पार करावी लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमेश्वर विधानसभा मतदारसंघामधील बसौली-सोमेश्वर रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधण्यात आला आहे. मात्र, त्यावेळी या मार्गात लागणाऱ्या नदीवर पूल बांधण्यात आलेला नाही. ते काम अद्यापही अपूर्णच आहे.

येथील विधानसभा मतदारसंघामधून 2007 साली निवडून आलेले अजम टम्टा हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते; परंतु त्यांच्या कालखंडातदेखील या ठिकाणी पुलाचे काम होऊ शकले नाही. सध्या या मतदारसंघात आमदार असलेल्या रेखा आर्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत. मात्र, असं असतानाही या नदीवरील पूल बांधण्याची योजना केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील अनेक वर्षांपासून गावकरी नदीवर पूल होण्याची वाट पाहत आहेत. याविषयी अधिक माहिती देताना जिल्हा पंचायतीचे सदस्य योगेश बाराकोटी यांनी सांगितले की,चालत जाणारे लोक असो किंवा बाईक अथवा चारचाकी गाडीने जाणारी मंडळी असो सर्वांना नदीच्या पाण्यामधूनच प्रवास करावा लागतो. यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत. अनेकदा गाड्या पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकतात आणि लोकांना त्रास सहन करावा लागतो. एका हिंदी वृत्तवाहिनीला माहिती देताना त्यांनी हे सांगितले आहे.

पावसाळ्यामध्ये मुलांना शाळेत पाठवताना अधिक धोका
पावसाळ्यात या भागात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ताकुलवरून सोमेश्वरला जाता येत नाही. महिला आणि मुलांना नदी ओलांडणे खूपच कठीण जातं. पावसाळ्यामध्ये मुलांना शाळेत पाठवताना अधिक धोका असल्याचंदेखील स्थानिकांनी म्हटलं आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे अल्मोडामधील अभियंते असणाऱ्या किशन आर्या यांनी या ठिकाणी पूल बांधण्याची योजना अनेकदा तयार करण्यात आली; परंतु यासाठी ठेकेदार मिळत असल्याचे नागरिकांना सांगण्यात येत आहे.