‘या’ बंडखोर नेत्याची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ( Mahavikas Aaghadi) अमरावतीतील (Amrawati) अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर (Shekhar Bhoyer) यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून ( NCP) हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाची शिस्त मोडल्यामुळे चंद्रशेखर भोयर यांच्यावर ही कारवाई केल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे ( Shivajirao Garje) यांच्याकडून देण्यात आली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे ( Sivsena) श्रीकांत देशपांडे ( Shrikant Deshpande) यांना महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणताही पाठिंबा नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षाची शिस्त भंग केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

अमरावतीत रंगणार चौरंगी लढत..?

कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रातील पहिल्या निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. शिक्षण संघर्ष समितीच्या वतीने नेहमी चर्चेत असलेल्या संगीता शिंदेसुद्धा ही निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आता अमरावती विभागात विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे, नितीन धांडे, शेखर भोयर आणि संगीता शिंदे अशी चौरंगी लढत रंगणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. 1 डिसेंबर रोजी मतदान, तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच अमरावती शिक्षक मतदारसंघातील विद्यमान शिवसेना-भाजप युतीचे आमदार श्रीकांत देशपांडे यांना भाजपचे संभाव्य उमेदवार नितीन धांडे यांच्याकडून तगडे आव्हान देण्यात येणार आहे.

वाढीव वीजबिलाचा मुद्दा आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याच्या घोषणेवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. याच मुद्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्तीच्या दिवशी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना जरा घाईच केली. त्यांनी ही घोषणा करण्याआधी पक्षातील आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करायला हवी होती. मात्र, त्यांनी तसे काही केले नाही, अशी कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून देण्यात आली. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण यांचे चांगलेच कान टोचले आहेत.