‘जे लोक सरकारला आवडत नाहीत, त्यांना दहशतवादी घोषित केले जाऊ शकते’, अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचे वादग्रस्त विधान

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाईन – सरकारला जे लोक आवडत नाहीत, त्यांना दहशतवादी घोषित केेले जाऊ शकते. तसेच त्यांना जेलमध्ये पाठवले जाते, असे मत नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन (Nobel laureate economist Amartya Sen) यांनी व्यक्त केले आहे. मात्र त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अमर्त्य सेन यांनी एका न्यूज एजन्सीला ई-मेलच्या माध्यमातून मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, कन्हैया कुमार, शेहला राशिद आणि उमर खालिद सारख्या युवा नेत्यांसोबत शत्रूप्रमाणे व्यवहार केला जात आहे. शांततापूर्ण प्रकारे पुढे जाण्याची संधी द्यायला हवी होती. मात्र दडपशाहीप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचे देखील सेन यांनी म्हटले आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला देखील त्यांनी समर्थन दिले आहे.

विश्वभारती विद्यापीठाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला अतिक्रमण करणाऱ्यांची एक यादी पाठवली. या यादीत अमर्त्य सेन यांच्या नावाचाही समावेश आहे. विश्व भारतीच्यावतीने सेन यांच्या दिवंगत वडिलांना जमीन कायदेशीररित्या भाड्याने दिली होती असे विद्यापीठाने म्हटले आहे. मात्र विद्यापीठाच्या कोणत्याही जमिनीवर अतिक्रमण केल्याच वृत्त सेन यांनी फेटाळून लावल आहे. याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील अमर्त्य सेन यांना पाठिंबा दर्शवला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.