काँग्रेसला ‘झटका’ ! विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा ‘विक्रमी’ मतांनी विजय

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना तगडा झटका बसला असून औरंगाबाद मधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत काल शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांनी विक्रमी मते मिळवत काँग्रेसच्या बाबुराव कुलकर्णी यांचा धुव्वा उडवला.

या निवडणुकीत अंबादास दानवे यांना 547 पैकी 523 मते मिळाली असून यामुळे आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. या जागेवर शिवसेनेचा विजय आधीपासूनच नक्की होता. मात्र तरीदेखील आघाडीने याठिकाणी उमेदवार दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने काँग्रेसच्या बाबुराव कुलकर्णी यांच्या विजयाच्या आशा मावळल्या होत्या. मात्र तरीदेखील त्यांनी रिंगण्यात उतरण्याचा निर्णय घेतला होता.

अपेक्षेप्रमाणे या लढतीचा निकाल एकतर्फी लागल्याने विशेष काही फरक पडला नाही. या निवडणुकीत 98.50 टक्के मतदान झाले. त्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांच्या ११० समर्थकांनी आपला पाठिंबा दिल्याने विजय सोपा झाल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांनी दिली. या निवडणुकीत दस्तुरखुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातल्याने हि निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची झाली होती. त्याचबरोबर शिवसेनेचे अनेक मंत्री देखील या निवडणुकीकडे लक्ष देऊन होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुणाचं किती संख्याबळ ?
या निवडणुकीत एकूण 556 मतदार होते. यामध्ये 336 मते हि युतीकडे होती. त्यामुळे त्यांचा विजय सहज मानला जात होता. मात्र काही दिवस आधी आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील अंबादास दानवे यांना पाठिंबा जाहीर केल्याने कुलकर्णी यांची विजयाची आशा मावळली.