OIC मध्ये पाकिस्तानला झटका ! सौदी अरेबिया आणि UAE नं केलं भारताचं समर्थन, मलेशियाच्या भूमिकेत झाला बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुन्हा एकदा पाकिस्तानची भारतविरोधी प्रचार मोहीम आणि भारत व अरब यांच्यात संबंध बिघडवण्याच्या षडयंत्राला मोठा धक्का बसला आहे. संयुक्त राष्ट्रामध्ये इस्लामिक देशांची संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन (ओआयसी) च्या व्हर्चुअल बैठकीत पाकिस्तानने इस्लामोफोबियाच्या आरोपाखाली भारताला घेरण्याचा प्रयत्न केला, पण ओआयसीचे काही सदस्य देश सौदी अरेबिया, युएई आणि ओमान यांनी भारताला पाठिंबा दिला. पाकिस्तानच्या आरोपावर ओआयसीच्या इतर देशांनी प्रतिक्रिया दिली नाही.

मालदीवनंतर भारतासोबत उभे झाले सौदी अरेबिया, युएई आणि ओमान
गेल्या शनिवारी मालदीवने संयुक्त राष्ट्रांच्या ओआयसीच्या व्हर्चुअल बैठकीत भारताविरूद्ध पाकिस्तानकडून सुरू असलेल्या प्रचाराचा बडगा उगारला होता. एका वृत्तसंस्थेनुसार, मालदीव व्यतिरिक्त सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांनीही या प्रकरणात भारताला पाठिंबा दिला असून पाकिस्तानचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर भारताचा रणनीतीक भागीदार ओमानने त्याला ओआयसीमध्ये भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितले. हे ओआयसीमध्ये भारताचे महत्त्व देखील दर्शवते. याला सौदी अरेबिया आणि युएई सह भारताच्या वाढत्या व्यापार संबंधांच्या पार्श्वभूमीवर पाहिले जाऊ शकते.

मलेशियाची भूमिकासुद्धा बदलली
सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या या प्लॅन मागे तुर्कीचा हात आहे, ज्याला ओआयसीमध्ये सौदी आणि युएईचे महत्त्व कमी करायचे आहे. यापूर्वी पाकिस्तान आणि तुर्कीची साथ देणाऱ्या मलेशियाची भूमिका देखील या वेळी बदलली. यावेळी त्यांनी पूर्वीप्रमाणे पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही. यापूर्वी मलेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांच्या नेतृत्वात भारताचा विरोध केला गेला होता, पण मलेशियात नेतृत्व बदलल्यामुळे त्यांची भूमिका देखील बदलली आहे.

पाकच्या इस्लामोफोबियाच्या आरोपाला दिले उत्तर
ओआयसीच्या व्हर्चुअल बैठकीत संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे राजदूत मुनीर अकरम यांनी दावा केला की, भारतात इस्लामोफोबियाला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याला उत्तर देताना यूएन मध्ये मालदीवचे स्थायी प्रतिनिधी थिलमीजा हुसेन म्हणाले होते की, भारताच्या संदर्भात इस्लामोफोबियाचा आरोप लावणे खरं तर चुकीचे आहे. ते म्हणाले होते की, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही आणि बहुसांस्कृतिक समाज आहे. येथे २० कोटीहून अधिक मुस्लिम राहतात.

अशात इस्लामोफोबियाचा आरोप लावणे चुकीचे ठरेल. ते म्हणाले की, दक्षिण आशियाई प्रदेशातील धार्मिक समरसतेसाठी असे करणे हानिकारक असेल. शतकानुशतके भारतात इस्लाम अस्तित्वात आहे आणि हा १४.२ टक्के लोकसंख्या असलेला भारतातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. थिलमीजा म्हणाले होते कि जगाने द्वेष, पूर्वग्रह आणि वंशवाद या संस्कृतीत एक चिंताजनक वाढ पाहिली आहे. राजकीय आणि इतर विचारसरणी/ अजेंडा यांना प्रोत्साहन देण्यासाठी हिंसेच्या बदल्यात हिंसाच वापरली गेली आहे. मालदीव जगात कुठेही अशा प्रकारच्या कृतीविरूद्ध ठामपणे उभा आहे.