अमेरिकेचा चीनला सज्जड इशारा, पुन्हा एकदा भारताच्या बाजूनं उभा ठाकला

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाइन –  अमेरिका आणि चीनच्या मध्ये सुरु असलेल्या वादात भारत जर ट्रम्प सरकारच्या पाठीमागे उभा राहिला, तर हे भारताच्या अर्थव्यवस्थेस घातक ठरु शकते, अशी धमकी चीनने भारतास सोमवारी दिली होती. चीनने दिलेल्या या धमकीवरती अमेरिकेने चीनला प्रत्युत्तर देत म्हटलं आहे की, आता चीनने जगातील इतर देशांना धमकावने सोडून द्यावं. तसेच अमेरिकेतील एका वरिष्ठ खासदाराने म्हटलं आहे की, आता चीनने शेजारील देशांचा मान ठेवला पाहिजे.

अमेरिकेतील वरिष्ठ खासदार आणि परराष्ट्र संबंधातील पॅनलचे प्रमुख इलियट एल. एन्जल यांनी सांगितलं की, अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयसुद्धा भारत-चीन सीमेवरील तणावामुळं चिंतेत आहे. त्यांनी म्हटलं, चीनच कामच आहे अशा धमक्या देणे. मात्र, आम्ही अपेक्षा करतो, की त्यांनी आपली ही सवय सोडून शेजारील देशांशी ‘डिप्लोमसी’च्या माध्यमातून मुद्दे सोडवावेत. इलियट पुढं म्हणाले, कोरोना संसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. असं असताना देखील भारत-चीन सीमेवर तणावाची असलेली परिस्थिती संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. चीनने आंतराष्ट्रीय सीमांचे पालन करायला हवे. तसेच काही समस्या किंवा वाद असतील, तर तो डिप्लोमसी’च्या माध्यमातून सोडविण्यात यावेत.

डेमोक्रॅट पक्षाच्या वरिष्ठ खासदारांपैकी एक असलेले इलियट हे अमेरिकेतील अत्यंत प्रभावशाली खासदार आहेत. काश्मीर मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी म्हटलं की, अमेरिकेची स्पष्ट भूमिका आहे की, हा भारत आणि पाकिस्तानचा द्विपक्षीय मुद्दा असून, त्यांनी तो चर्चेतून सोडवायला हवा. यामध्ये अमेरिकेची भूमिका चर्चेसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे, एवढीच असू शकते. तसेच पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवादी कारवायांवरही ठोस पावले उचलण्याची गरज आहे. असे झाले, तरच या देशात चर्चा होणे शक्य असल्याचं मत त्यांनी मांडलं.

चीन इतरांसाठी धोका निर्माण करतोय –

गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये सुरु असलेल्या भारत आणि चीन तणावाबाबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी चीनी सेनेच्या हालचालींबाबत महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं, चीन भारताला लागून असलेल्या सीमेवरती मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव करत असून, चीन आपल्या रणनीतीचा स्वतःच्या भल्यासाठी उपयोग करत आहे आणि इतरांसाठी धोका निर्माण करत आहे.