‘भारतीय जनता पार्टी’ नव्हे तर ‘भारतीय जुमला पार्टी’ : अमित देशमुख

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – राहुल गांधी एकटे आहेत म्हणून विरोधक टीका करत आहेत. तुम्ही टीका करत राहा राहुल गांधी देश जिंकत राहतील. ह्या सरकारला निरोप देण्याची वेळ आली असून भारतीय जनता पार्टी नव्हे तर भारतीय जुमला पार्टी भाजपा बनत चालली आहे अशी टीका सरकारवर लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी केली आहे. लातूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

युती सरकारवर टीका करताना अमित देशमुख म्हणाले की, ‘राहुल गांधी एकटे आहेत म्हणून टीका करत आहेत. मात्र तुम्ही टीका करत राहा राहुल गांधी देश जिंकत राहतील. दोन्ही सरकारला निरोप देण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्रांच्या सभेने दिल्लीची नाही तर गल्लीची निवडणूक करून टाकली आहे. चोवीस तास पाणी देऊ म्हणणारे आज महिन्याला पाणी देत आहेत आणि त्यावर मात्र काही बोलत नाहीत.

दरम्यान, यावेळी त्यांनी शिवसेना भाजपच्या युतीवरही टीका केली. शिवसेना मोठा भाजपा लहान म्हणत ज्यांनी गोंधळ केला त्यांनी निवडणुका येताच गळ्यात गळे घालून त्यांनी लोकांची दिशाभूल केली असा आरोप अमित देशमुख यांनी केला. भाजपाचे वचनपत्र नव्हे हे संकटपत्र आहे. भारतीय जनता पार्टी नव्हे तर भारतीय जुमला पार्टी भाजपा बनत चालली आहे . त्यामुळे आता काँग्रेस हा पर्याय असल्याचं अमित देशमुख म्हणाले.