CAA : काँग्रेस, ममता, केजरीवालांची भाषा इम्रान खान यांच्यासारखी, अमित शहांचा ‘हल्लाबोल’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन (CAA) भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेसवर हल्ला चढविला आहे. ‘काँग्रेसवाले कान उघडे ठेऊन एका, तुम्ही कितीही विरोध केला तरीही आम्ही सर्वांना नागरिकत्व देऊनच राहू’ अश्या शब्दात त्यांनी काँग्रेसला आव्हान केले. तसेच राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांची भाषा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासारखी असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला. मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये एक सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

काँग्रेस पक्ष, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, कम्युनिस्ट पक्ष एकत्र येऊन देशाच्या जनतेची दिशाभूल करत आहेत. नागरिकत्व कायद्यात कोणाचंही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही. उलट या कायद्यात नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यात नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद असल्यास राहुल गांधी आणि ममता बॅनर्जींनी ती शोधून दाखवावी, असं थेट आव्हान अमित शहांनी दिलं.

‘काँग्रेसनच धर्माच्या आधारे देशाची फाळणी केली. त्यावेळी पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमधल्या हिंदू, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन धर्मीयांना भारतात यायचं आहे. मात्र त्यावेळची परिस्थिती अतिशय वाईट होती. त्यामुळे आपल्या देशातल्या सर्व नेत्यांनी त्यांना तिथेच राहण्याचा सल्ला दिला. भविष्यात तुम्ही भारतात याल, तेव्हा तुमचं स्वागत होईल. तुम्हाला भारताचं नागरिकत्व दिलं जाईल, असं आश्वासन त्यावेळी भारतातल्या नेत्यांनी पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांकांना दिलं होतं,’ असं शहा म्हणाले.

तसेच अमित शहा पुढे म्हणाले कि, भारतावर जितका तुमचा आणि माझा अधिकार आहे, तितकाच अधिकार पाकिस्तानहून आलेल्या शरणार्थींचादेखील आहे. महात्मा गांधींनी देखील पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू शरणार्थींना स्वीकारा, असे म्हंटल होत. मात्र राहुल गांधी आणि काँग्रेसला महात्मा गांधींचा विसर पडला आहे, आज काँग्रेस नेते देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं करत आहेत, असे म्हणत शहांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/