काँग्रेसनं सादर केली ‘अमित शहा आमदार खरेदी यादी’, भाजपावर घोडेबाजार केल्याचा आरोप

नवी दिल्ली : – राजस्थान राज्यामध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. भाजपकडून घोडेबाजारी होत आहे. येथील आमदारांना खरेदी करण्यासाठी कोट्यवधीच्या ऑफर दिल्या जात आहेत, याबाबत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी काही फोनवरील ऑडीओ क्लीपही पुरावा म्हणून दाखवल्या आहेत. त्यानंतर आता काँग्रेस पक्षाने ट्विटर अकाऊंटवरुन भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर आमदार खरेदीचा आरोप केला आहे.

काँग्रेस पक्षाने ट्विटरवर म्हटले आहे की, भाजपकडे घोडेबाजारी करण्यासाठी भरपूर पैसा उपलब्ध आहे. पण, सामान्य लोकांना कोरोनाच्या संकटातून वाचवण्यासाठी निधी उपलब्ध नाही, असे सांगत त्यांनी एक फोटो अपलोड केला आहे. यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले आहे.

Amit Shah’s MLA Shopping List असे लिहिले असून त्यात मध्यप्रदेश – 22, कर्नाटक -16, गोवा – 13, मणिपूर 8, आसाम – 9 अशा विरोधी पक्षातून घेतलेल्या आमदारांची आकडेवारी सांगितली आहे.

भाजप सत्तेच्या भुकेपोटी देशातील लोकशाही परंपरेचा अपमान करत आहे, आमदार खरेदी करणे, सरकार पाडणे हा भाजपचा स्वभाव बनला आहे. लोकशाहीच्या हत्येचा हा खेळ अधिक दिवस चालणार नाही. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर येथे हॉर्स ट्रेडिंग, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र येथे लोकशाहीचा अपमान, तर गुजरात, राजस्थानमध्ये घोडेबाजाराचा प्रयत्न, अशा शब्दांत काँग्रेसने केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपने मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार पाडलं, ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांच्या समर्थक आमदारांना काँग्रेसविरोधात बंडखोरी करण्यास भाग पाडले. त्यानंतर मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस सरकार कोसळून भाजप सरकार स्थापन झालं, त्यानंतर आता राजस्थानात काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांना हाताशी धरुन भाजप राजस्थानमध्ये काँग्रेसच सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असाही आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.

काँग्रेसच्या आमदारांना 20-30 कोटींची ऑफर दिली जात आहे.तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेसच्या आमदारांना खरेदी करण्यासाठी ऑफर दिल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर सचिन पायलट आणि समर्थक आमदारांच्या बळावर राजस्थानात सरकार पाडून भाजपचे सरकार आणण्याचा डाव आखला जात आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान झाल्यानंतर महाराष्ट्राकडे भाजप मोर्चा वळवणार आहे, अशीही चर्चा होत आहे.