‘तुम्ही राणेंना कितीही ताकद द्या, आगामी निवडणुकीत पुन्हा पराभव करणार’ : आ. वैभव नाईक

सिंधुदुर्गः पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नारायण राणेंना कितीही बळ पुरवले तरी ते शिवसेनेला घाबरून मैदान सोडून पळ काढणार नाहीत, याची खातरजमा शाह यांनी करून घ्यावी असा टोला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे. तसेच राणेंना कितीही ताकद दिली तरी पुढच्या निवडणुकीत शिवसेना त्यांना पुन्हा एकदा पराभूत करून भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला आहे.

अमित शाह रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यावर होते. त्यांच्या या दौ-यामुळे कोकणात शिवसेना विरुद्ध भाजपा वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. शाहा यांनी शिवसेनेवर टीका करत नारायण राणे यांना बळ आणि योग्य सन्मान देण्याचे सूचक विधान केल्यानंतर आता शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंना पराभवाचा धक्का देत सिंधुदुर्गमधील कुडाळ-मालवण मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवणाऱ्या वैभव नाईक यांनी आता राणे आणि भाजपवर निशाणा साधला आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंचा उल्लेख महाराष्ट्राचे दबंग नेते असा केला होता. मात्र या दबंग नेत्याला पक्षात प्रवेश देण्यासाठी वर्षभर का ताटकळत ठेवले, असा सवाल नाईक यांनी केला आहे.