… तर तुम्ही एकमेकांना सोडून द्या, MP नवनीत राणा यांचा ठाकरे सरकारला सल्ला

अमरावतीः पोलीसनामा ऑनलाईन – एकमेकांचे विचार पटत नसताना देखील राज्यात शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष यांचे महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi government) सत्तेत आले. मात्र आता विचार जमत नसेल तर तुम्ही एकमेकांना सोडून द्या, असा सल्ला अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगाबादच्या नामांतरावरून पुन्हा मतभेद समोर आले आहेत. त्यामुळे सरकारमध्ये वादंग निर्माण होण्याची शक्यता असून भाजपकडून सरकारला कोंडीत पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापार्श्वभूमीवर खा. राणा यांनी ठाकरे सरकावर जोरदार टीका केली आहे. घरात जस जावा आणि दिराच भांडण असते, तसं सररकारच सुरु आहे. जबरदस्तीने सरकारमध्ये राहण आणि विचार न पटण अशी अवस्था त्यांची झाली आहे, हे लोकांना स्पष्ट दिसत आहे, असे म्हणत खा. राणा यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, औरंगाबादच संभाजीनगर असं नामांतर करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत पक्षाची भूमिका जाहीर केली. आमच्यासाठी लोकांचा विकास महत्त्वाचा असून नाव बदल्याने विकास होत नाही, असे थोरात यांनी म्हटले आहे. काँग्रेसने नामांतराला विरोध केल्यानंतर भाजपनेही शिवसेनेला कोंडीत पकडत टीकास्त्र सोडले आहे. त्यानंतर शिवसेनेन पलटवार करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे एकंदरीतच या मुद्द्यावरून पुढील काही दिवस राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार, हे मात्र स्पष्ट आहे.