दुसरं लग्न केल्याच्या वादातून भावानेच केला भावाचा खून

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – दुसरं लग्न केल्याच्या वादातून भावानेच भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरात घडली आहे. ही घटना शहरातील हमलपुरा येथे रविवारी (दि.14) सकाळी घडली आहे. कैलास मोहन अजबे (वय-38 रा. चिचफैल) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सुनिल माणिक अजबे (वय-45 रा. हमालपुरा) त्याची आई व पत्नी यांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कैलास अजबे याने नुकतंच दुसरं लग्न केलं होतं. त्यामुळे दुसरं लग्न का केलं ? असा प्रश्न कैलास अजबे याला त्याच्या भावाकडून विचारला जात होता. याच मुद्यावरून झालेल्या वादात कैलास अजबे याला आपला जीव गमवावा लागला आहे.

पहिली पत्नी असताना तिला मुलबाळ होत नसल्याने कैलासने दुसरे लग्न केलं होतं. या मुद्यावर कुटुंबात तणावाचं वातावरण तयार झालं. रविवारी हा वाद टोकाला गेला आणि कैलासचा भाऊ सुनिल याच्याकडून नको ते घडलं. सुनिल याने कैलासवर केलेल्या हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती परिसरात पसरताच भीतीचं वातावरण तयार झालं आहे. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देऊन तिघांना अटक केली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.