‘सामना’ रंगण्याआधी अमृता फडणवीसांचे रश्मी ठाकरेंबाबत ट्विट, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे याची निवड करण्यात आली. इतिहासात पहिल्यांदाच सामनाला पहिल्या महिला संपादक मिळाल्या आहेत. एकीकडे भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस शिवसेनेविरोधात सोशल मीडियावर आक्रमक झाल्या असतानाच रश्मी ठाकरेंकडे ही जबाबदारी आल्याने भविष्यात या दोघींमध्येही राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत रश्मी ठाकरे यांचं या नव्या जबाबदारीबद्दल अभिनंदन केलं आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, सामनाच्या संपादकपदी निवड झाल्याबद्दल रश्मी ठाकरे आपलं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा. आपल्या देशात महिला आणि समाजाच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उच्च पदावर अधिक महिलांची आवश्यकता आहे आणि लोकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या विषयावर त्यांचे मत मांडण्यासाठी हे व्यासपीठ देखील आहे, असे अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून अमृता फडणवीस सातत्याने शिवसेनेवर सोशल मीडियावरून जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. दोनच दिवसांपूर्वी अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती. दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी अभिनंदन केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.