आदित्य ठाकरेंना अमृता फडणवीसांनी दिली रेशमी किड्याची ‘उपमा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बांगड्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून फडणवीस आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात जुपलेली असतानाच अमृता फडणवीस यांनी या वादात उडी घेतली आहे. अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना ‘रेश्मी’ किड्याची उपमा देताना त्यांना उपहास काय कळणार ? असा खोचक टोला लगावला आहे.

फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनावेळी आझाद मैदानातील भाषणात शिवसेनेवर टीका केली होती. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. शिवसेनेनं यावर अद्याप चुप्पी साधली होती. मात्र, पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांनी ट्विट करत फडणवीसांना लक्ष केले. विधानाबद्दल माफी मागण्याचं आवाहनही केलं होतं. तसेच महिला या सर्वात शक्तीशाली असून त्या बांगड्या परिधान करतात. राजकारण हे चालतच राहते, पण ही मानसिकता बदलायला हवी, असे अदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांना उद्देशून ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विटला देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी रिप्लाय करत प्रत्युत्तर दिले आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘रेश्मी’ किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही. कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेश्मी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते, अशी खोचक टीका करताना देवेंद्रजी तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो, असे ट्विट त्यांनी केले आहे. आता अमृता फडणवीस यांच्या टीकेला शिवसेना काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.