शरद पवारांनी आंबेडकरी चळवळीची पिढी बरबाद केली : आनंदराज आंबेडकरांचा आरोप

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – चुकीच्या नेत्याला पुढे आणून शरद पवार यांनी आंबेडकरी चळवळीची एक पिढी बरबाद केली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा शरद पवारांवर राग आहे, असे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आज सांगितले. आनंदराज आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारासाठी पंढरपूरमध्ये आले होते. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केला.

शरद पवारांनी चुकीच्या नेत्याला पुढे आणले. या नेत्यामुळे आंबेडकरी चळवळीचे ३० ते ४० वर्षाचे राजकारण फुकट गेले आणि आज तो नेता स्वात:ही पवारांच्या सोबत नाही, असे आनंदराज आंबेडकर म्हणाले. आनंदराज यांनी रामदास आठवले यांचे नाव न घेता शरद पवारांवर हल्लाबोल केला.

सोलापूरमध्ये काल झालेली शरद पवार यांची सभा केविलवाणी होती. ज्या सेनापतीने रिंगणातून पळ काढला त्याच्याबाबत आपणास काहीच बोलायचे नाही, असा टोला त्यांनी पवार यांना हाणला. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची ‘बी’ टीम नसून काँग्रेसच भाजपची ‘ए’ टीम आहे. उत्तर प्रदेशात हे सिद्ध झाले असल्याचेही ते म्हणाले.